जगाला सामर्थ्यशाली बनवण्याची भारतात क्षमता: कुलगुरू डॉ. विलास सपकाळ
दिमाखदार पथसंचलन आणि विविध सादरीकरणाच्या माध्यमातून एमजीएममध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा
भारताचा 25 वर्षांच्या टप्प्यात विकास बघितला तर सुरुवातीच्या 25 वर्षात भारताने आपले सामर्थ्य ओळखुन मनुष्यबळ निर्मिती, शिक्षण आणि आरोग्य यावर भर दिला. दुसऱ्या 25 वर्षात याच सामर्थ्याच्या बळावर हरित, अवकाश आणि तंत्रज्ञानात भरारी घेतली आणि तिसऱ्या 25 वर्षात भारत अन्न, ऊर्जा आदी क्षेत्रात प्रबळ होऊन जगाला भारतीय मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि संशोधनाने बळकट केले आहे. आज आपण स्वयंपूर्ण तर आहोतच पण आपल्या समर्थ्यामुळे जगालाही सामर्थ्यशाली केले आहे, अशी भावना एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी व्यक्त केली.
महात्मा गांधी मिशनच्या वतीने एमजीएम स्टेडियमवर आयोजित स्वातंत्र्य दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, अनुराधाताई कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, काशी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.बी.बी.ओझा, रचना सपकाळ, डॉ. गिरीश गाडेकर, डॉ.क्षितिजा गाडेकर, कुलसचिव आशिष गाडेकर, डॉ.सारिका गाडेकर आदी उपस्थित होते.
डॉ.सपकाळ पुढे म्हणाले, नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या क्रीडापटूंनी आपल्या दर्जेदार कामगिरीने सामर्थ्य सिद्ध केले. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान केले ते ज्ञात ठेऊन जगाच्या कल्याणासाठी आपण सामर्थ्य प्राप्त केले पाहिजे. आज भारत श्रेष्ठ आणि सामर्थ्यशाली देश असून जगाला समर्थ बनवण्याची क्षमता या देशात आहे. पुढील पिढ्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रतिभासंपन्न होत सर्वांचे कल्याण करावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, महात्मा गांधी मिशनअंतर्गत कार्यरत सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी परेड कमांडर आणि जेएनइसीचा विद्यार्थी जावेद खानच्या नेतृत्वात आणि कॅप्टन आर.के.दानवे यांच्या मार्गदर्शनात दिमाखदार आणि शिस्तबद्ध पथसंचलन केले. एमजीएम संस्कार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बँडवादन तसेच एमजीएमच्या संगीत विभागाने ‘वृंदगान’ अंतर्गत देशभक्तीपर रचना तसेच सर्वधर्म प्रार्थना सादर केली
यावेळी ‘गवाक्ष’ या ग्रुहपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. ‘रक्तदान हेच जीवदान’ या संकल्पनेवर एमजीएम वैद्यकीय रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत रक्तदानाविषयी जनजागृती केली. तर, आपल्या वैयक्तिक आयुष्यात आजवर किमान 50 ते 75 वेळा रक्तदान करणारे अभिजित कुलकर्णी, राजेंद्र राठोड, ऍड.अहमद सिद्दीकी, अभिषेक कंदवाल, अमित जालनावाला, हरिभाऊ कुरमे, संजय पतंगे, कृष्णा कुलकर्णी, प्रज्वल मिठावाला, विनोद गांधी, अनिकेत जोशी, मोहम्मद असिफ, प्रवीण हस्तक, श्रीकांत चौधरी आदींचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. क्लोव्हर डेल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी म्युझिकल एरोबिक डान्स, संस्कार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जम्पिंग रोप
सादर केले.
पथसंचलन आणि अन्य उपक्रमात उत्तम सादरीकरण करणारे क्लोव्हर डेल स्कुल, संस्कार विद्यालयाच्या चमुला तसेच परेड कमांडर जावेद खान, एनसीसी टीमला गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट पथसंचलनासाठी पुरुष गटात प्रथम पुरस्कार एनसीसी टीम जेएनईसी, द्वितीय एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, तृतीय पुरस्कार क्लोव्हर डेल स्कुल आणि एनएनएस मेडिकल कॉलेजच्या चमुला तर महिला गटात प्रथम जेएनइसी, द्वितीय एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्स अँड टेक्नॉलॉजी, तृतीय संस्कार विद्यालयाच्या चमुला प्रदान करण्यात आला.
जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ध्रुव देशपांडे, यश इंगळे, वंशिता जोशी, वैष्णवी शास्त्री, श्रावणी चिकलठाणकर या विद्यार्थ्यांनी संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
जेएनईसी प्रवेशद्वाराचे उदघाटन
चार दशकांपासून दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देणारे जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन प्रवेशद्वाराचे स्वातंत्र्यदिनी उदघाटन करण्यात आले. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, अनुराधाताई कदम, कुलगुरू विलास सपकाळ आदी उपस्थित होते.
या महाविद्यालयाच्या उभारणीत अमूल्य योगदान देणारे प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे पदचिन्ह कोनशीलेवर उमटवून अनोख्या पद्धतीने या प्रवेशद्वाराचे उदघाटन करण्यात आले. चिस्तिया चौक ते सेंट्रल नाका मार्गावर असलेल्या या प्रवेशद्वारास ‘प्रताप बोराडे द्वार’ नाव देण्यात आले आहे.
एमजीएम विद्यापीठात एज्युकेशन एक्स्पोचे उद्घाटन
28 ते 30 जुलैदरम्यान आयोजन, विद्यार्थ्यांना निशुल्क कलचाचणीही करता येणार
एमजीएम विद्यापीठात आयोजित एज्युकेशन एक्स्पोचे गुरुवारी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी द्वारकाभाऊ पाथ्रीकर, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, डॉ. एच. एच. शिंदे, डॉ. बी. एम. पाटील, डॉ. रेखा शेळके, डॉ. प्राप्ती देशमुख आदींची उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ म्हणाले, विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता आणि आवडीनुसार कोणता अभ्यासक्रम निवडावा, यासाठी एमजीएम विद्यापीठाच्या वतीने एज्युकेशन एक्स्पोमध्ये अॅप्टीट्यूड टेस्टचे नियोजन करण्यात आले आहे. या वेळी विद्यार्थ्यांचे समुपदेशनही केले जाणार आहे. एमजीएम विद्यापीठात अत्यंत अभिनव आणि कौशल्याधारीत अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या एक्स्पोमध्ये त्यांना या सर्व अभ्यासक्रमांची माहिती मिळू शकेल. कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर म्हणाले, एमजीएम एज्युकेशन एक्स्पोच्या माध्यमातून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना एकाच छताखाली विविध अभ्यासक्रमांची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांनी या एक्स्पोत सहभागी होऊन आपले उज्वल करिअर घडवावे, असे आवाहनही डॉ. गाडेकर यांनी केले.
एमजीएम विद्यापीठ एज्युकेशन एक्स्पोचे दि. 28, 29 आणि 30 जुलै 2022 दरम्यान आयोजन करण्यात आले असून या वेळी विविध प्रवेशांसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची निशुल्क कलचाचणीही केली जाणार आहे. एमजीएम विद्यापीठ एज्युकेशन एक्स्पोमध्ये विद्यार्थ्यांना एमजीएम विद्यापीठामध्ये उपलब्ध इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन, फाईन आर्ट, संगणकशास्त्र, इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, बायोसायन्स अँड टेक्नॉलॉजी, बेसिक अँड अप्लाईड सायन्सेस, परफॉर्मिंग आर्ट्स, जर्नालिझम अँड मीडिया, फिल्म आर्टस्, फोटोग्राफी, सामाजिक शास्त्रे, भारतीय आणि विदेशी भाषा, स्पोर्ट्स, योगविज्ञान, शारीरिक शिक्षण इत्यादी विद्याशाखेशी संबंधित विविध अभ्यासक्रम, त्या अभ्यासक्रमानंतर करिअरच्या संधी, त्यासाठी एमजीएम विद्यापीठात उपलब्ध सोयीसुविधा आदींची इत्यंभूत माहिती मिळू शकेल. याशिवाय, एक्सपोमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची निशुल्क कलचाचणी आणि समुपदेशनही केले जाईल. एमजीएम विद्यापीठामध्ये 350 पेक्षा अधिक पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दि. 28, 29 आणि 30 जुलै 2022 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत हा एज्युकेशन एक्स्पो एमजीएम विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत परिसरात करण्यात आला आहे. विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच आपल्या पाल्याच्या शिक्षणाबाबत माहिती घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी एमजीएम विद्यापीठात आयोजित या एज्युकेशन एक्स्पोला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी 9067612000 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन एमजीएम विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त ‘एमजीएम’मध्ये कविसंमेलन आणि पुस्तक प्रकाशनाचे आयोजन
मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्या विभागीय केंद्र, औरंगाबादतर्फे राज्य साहित्य पुरस्कारप्राप्त अविनाश उषा वसंत लिखित ‘कविता या हिणवलेल्या’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन तसेच निमंत्रित युवा कवींचे कवीसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वा. आयोजित करण्यात आला आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आसाराम लोमटे, समीक्षक आणि प्रा. डॉ. पी. विठ्ठल यांच्या उपस्थितीत अविनाश उषा वसंत यांच्या ‘कविता या हिणवलेल्या’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ असतील. तर, या वेळी यशवंतराव चव्हाण सेन्टर मुंबईच्या औरंगाबाद विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर आदींची उपस्थिती राहील. कार्यक्रमाचे निवेदन आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी नम्रता फलके या करतील. निमंत्रितांच्या कविसंमेलनात महाराष्ट्रातील तरुण कवी यामिनी विलास, धम्मपाल जाधव, डॉ. स्वप्नील चौधरी, अविनाश उषा वसंत, नम्रता फलके, शमिभा पाटील आपल्या कविता सादर करणार आहेत. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन कवी आणि पत्रकार नीलेश चव्हाण हे करतील, अशी माहिती एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनी दिली आहे.
एमजीएमच्या अपूर्वा खैरनारला मंगला विंचुर्णे- बर्दापूरकर पारितोषिक प्रदान
पत्रकारितेतून योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जावी, न्या.चपळगावकरांची भावना
पत्रकारितेचा काळ एका बाजूने खूप वाईट तर दुसऱ्या बाजूने तितकाच चांगलाही आहे. रवीश कुमारसारख्या पत्रकाराला धमक्या येत असतानाच नोबेलसारख्या पुरस्कारानेही पत्रकाराचा गौरव होत आहे. पत्रकारिता हा श्रमाचा भाग आहे. वाचकांना योग्य माहिती देण्याचा आनंद पत्रकारांनी घ्यायला हवा, अशी भावना सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी व्यक्त केली. महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठाच्या वतीने द्वितीय मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर स्मृती पारितोषिक वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाची विद्यार्थीनी अपूर्वा खैरनारला न्या. चपळगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.
एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी कुलपती अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, नंदिनी चपळगावकर, ज्येष्ठ संपादक आणि लेखक प्रवीण बर्दापुरकर, कुलसचिव आशिष गाडेकर, डॉ. रेखा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल महात्मा गांधी मिशनच्या वतीने न्या.नरेंद्र चपळगावकर यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला. दिवंगत पत्रकार मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २०२१ पासून पत्रकारिता अभ्यासक्रमातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थीनीला हे पारितोषिक दिले जाते. ११ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
प्रमुख अतिथी न्या.चपळगावकर पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना म्हणाले, मी साठच्या दशकात केसरी, इंडियन एक्सप्रेस, फ्री प्रेस जर्नलसाठी बातमीदारी केली. आपली अक्षरे बातमीच्या रुपात छापून येण्याचा आनंद निराळाच होता. छापील अक्षरांना तेव्हा असलेले महत्व आणि प्रतिष्ठा आजही आहे का, याचा विचार करायला हवा. आजच्या पत्रकारांनी प्रसिद्धी अधिकारी आणि आपल्यातील फरक ओळखावा. सुखवस्तू पत्रकारिता चैनीची आहे पण नोबेलविेजेती पत्रकार रेसाने निवडलेला मार्ग खडतर आहे. पत्रकारिता हा श्रमाचा भाग असून वाचकांना उत्तम माहिती देण्याचा आनंद पत्रकारांनी घ्यायला हवा, अशी भावनाही न्या.चपळगावकर यांनी व्यक्त केली. एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ अध्यक्षीय समारोपात म्हणाले, विद्यापीठ हे पत्रकारितेच्या सर्व बीट्सचे शिक्षण देणारे एकमेव ठिकाण असते. इंग्रजीसोबत अन्य विदेशी भाषांमध्येही पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू करण्याची एमजीएम विद्यापीठाची योजना आहे. अशा पुरस्काराच्या माध्यमातून नाविन्यपूर्णता आणून उच्च पातळी गाठण्याची प्रेरणा मिळते. होतकरू विद्यार्थ्यांनी या प्रेरणेतून आपले करिअर घडवावे. प्रवीण बर्दापूरकर यांनी पुरस्कारामागील भूमिका मांडली. तर, कुलपती अंकुशराव कदम आणि विश्वस्त प्रतापराव बोराडे, प्रा.डॉ. रेखा शेळके, अपूर्वा खैरनार यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. प्रा. दिव्या कांबळे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. आशा देशपांडे यांनी आभार मानले.

जागतिक बाल कर्करोग दिन विशेष
औरंगाबाद होतंय बालकर्करोगावरील उपचारांचे केंद्र
डॉ. तुषार इधाटे यांचा विश्वास, एम जी. एम रुग्णालयात तीनशेहून अधिक बालके कर्करोगमुक्त
जगभरात १५ फेब्रुवारी हा दिवस जागतिक बालकर्करोग दिन म्हणून पाळला जातो. बदलत्या जीवनशैलीतून कॅन्सरचा विळखा आता आबालवृद्धांमध्ये जडताना दिसत आहे. दरम्यान दुर्धर आजारांपैकी एक म्हणून कॅन्सरकडे पाहण्याच्या दृष्टीमुळे या आजाराबाबत अनेकांच्या मनात भीती आहे. त्यामुळेच जागतिक बालकर्करोग दिनाचे औचित्य साधत या आजाराबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे. यानिमित्त एम.जी.एम रुग्णालयात बालकर्करोग रुग्णाचा मेळावा आयोजित करण्यात आला. कॅनकिडस या दिल्ली स्थित संस्थेमार्फत उपचारादरम्यान सर्व रुग्णांना दरमहा २० किलो राशन व पोषक अन्न पदार्थाचे वाटप केले जाणार आहे “कर्करोगरावर मात करुन बहुतांश बालके सामान्य आयुष्य जगू शकतात. साधारपणे ७० ते ८० प्रतिशत बालके पूर्णपणे ठीक होतात त्यासाठी लवकर निदान व उपचार होणे आवश्यक आहे. औरंगाबाद हे कमी खर्चात बाल कर्करोग उपचाराचे प्रमुख केंद्र म्हणुन उदयास येत आहे’, असा विश्वास एम.जी. एम रुग्णालयातील लहान मुलांचे रक्तविकार व कर्करोग विभागप्रमुख डॉ. तुषार इधाटे यांनी व्यक्त केला.
एम. जी. एम. रुग्णालयाने नुकताच ३०० बालरुग्णांना कर्करोगमुक्त करण्याचा टप्पा पार केला आहे त्यानिमित्ताने ते बोलत होते. डॉ इधाटे म्हणाले, “एम .जी. एम. रुग्णालयाने पाच वर्षांपूर्वी बाल रक्तविकार व कर्करोग विभाग सुरु केला. गेल्या पाच वर्षात ३०० रुग्णांनी कर्करोग मुक्तीचा टप्पा पार केला आहे. मराठवाड्यातील प्रथम हिमॅटॉलॉजी कक्ष, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, समाजसेवक, आहारतज्ञ् यामळे एम. जी. एम हे बाल कर्करोग उपचारांचे प्रमुख केंद्र बनले आहे. “कर्करोगाच्या उपचारामधील बहुतांश रुग्ण हे मध्यमवर्गीय किंवा ग्रामीण भागातले होते, ज्यांना अनेक आर्थिक अडचणी होत्या. त्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था व दाते खंबीरपणे उभे राहिले. पूर्णवेळ समाजसेवक असल्याने याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन लाभले. या सर्व गोष्टीमुळे कुटुंबीयांमध्ये एक नवीन आशा निर्माण झाली आणि मिळालेल्या यशामुळे कर्करोग उपचाराबद्दल विश्वास वाढला, असेही त्यांनी सांगितले. एम. जी. एमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा म्हणाले ,” भविष्यात मराठवाड्यातील रुग्णांना सेवा मिळावी यासाठी वैद्यकीय सुविधा अजून अद्यावत करण्यात येतील जेणेकरून त्यांना मुंबई किंवा पुणे प्रवास करून जाण्याची गरज पडणार नाही. औरंगाबाद हे आता परवडणारे कर्करोग उपचार केंद्र म्हणून पुढे येत असुन याठिकाणी मराठवाडा, विदर्भ, खानदेशमधूनदेखील रुग्ण उपचारासाठी येत आहेत. लहान मुलांचे रक्तविकार व कर्करोग तज्ञ् डॉ. तुषार इधाटे व त्यांची टीम यांच्या यशस्वी कामगिरीबद्दल एम. जी एमचे सचिव अंकुशराव कदम, उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा , उपअधिष्ठाता डॉ.प्रवीण सुर्यवंशी व बालरोग विभाग प्रमुख डॉ माधुरी एंगाडे यांनी अभिनंदन केले आहे.
कुरणच्या जयहिंद इंजिनिअरिंग कॉलेज शिष्टमंडळाची एमजीएम विद्यापीठास भेट
पुणे जिल्ह्यातील कुरण येथील जयहिंद इंजिनिअरिंग कॉलेजच्या शिष्टमंडळाने बुधवारी महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठाच्या इन्क्युबेशन, इन्नोव्हेशन अँड रिसर्च सेंटरला (आयआयआरसी) भेट देऊन विविध तंत्रज्ञानांबद्दल माहिती जाणून घेतली. या वेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एच.एच.शिंदे, जयहिंद इंजिनिअरिंग कॉलेजच्या संचालिका प्रा.शुभांगी गुंजाळ, प्राचार्य डॉ. डी.जे. गरकल, जेएनइसी मेकॅनिकल विभागाचे डॉ. एम.एस. कदम, आयआयआरसीचे प्रमुख डॉ. नितीन फाफट आदी उपस्थित होते.
एमजीएम विद्यापीठाच्या आयआयआरसीमध्ये रोबोटीक्स, ऑटोमेशन, ड्रोन, आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आदी विविध तंत्रज्ञानाच्या लॅब आहेत. येथील तंत्रज्ञान पाहून जयहिंद कॉलेजच्या शिष्टमंडळाने आनंद व्यक्त केला. दरम्यान, या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेदरम्यान कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी आंतरमहाविद्यालयीन तसेच संस्थात्मक स्तरावर सामंजस्य करार करून काही उपक्रम राबवण्याबाबत सूचना केली. एकमेकांच्या सहकार्याने आणि सामंजस्याने आगामी काळात अनेक संशोधन होऊ शकतात. त्यासाठी विविध संस्थांनी समोर यायला हवे, असेही डॉ. सपकाळ म्हणाले. जयहिंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. गरकल म्हणाले, एमजीएमचा संपूर्ण परीसर हा अत्यंत सुंदर असून येथे भेट देऊन आम्हाला खूप आनंद झाला. एमजीएमचे आयआयआरसी हे सर्व सुविधांनी तसेच तंत्रज्ञानांनी सुसज्ज असून त्याचा संशोधन तसेच ज्ञानवृद्धीसाठी खूप फायदा होऊ शकतो.
भारतरत्न लता मंगेशकर यांना एमजीएम विद्यापीठात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
लतादीदींच्या सहवासात आलेल्या अनेक दिग्गजांनी व्यक्त केल्या भावना
भारतरत्न लता मंगेशकर यांना महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठाच्या वतीने सोमवारी सकाळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त प्रतापराव बोराडे, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर आदी उपस्थित होते.
लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत तसेच मौन बाळगत श्रद्धांजली सभेची सुरुवात झाली. त्यानंतर लता मंगेशकर यांच्याविषयी अनेकांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. आशिष गाडेकर आपल्या शोकसंदेशात म्हणाले, भारतरत्न लता मंगेशकर काल आपल्यामधून निघून गेल्यात आणि भारतीय संगीत क्षेत्रासोबतच त्यांच्या आवाजाने समृद्ध झालेल्या कित्येक पिढ्या पोरक्या झाल्या. लता मंगेशकर यांच्या आवाजाने आपल्या सर्वांनाच समृद्ध केले आहे. महात्मा गांधी मिशन आणि एमजीएम विद्यापीठाच्या वतीने मी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. लता मंगेशकर यांच्या जाण्याने झालेली हानी कधीच भरून निघू शकणार नाही. पण, आपल्या स्वराद्वारे त्या कायम आपल्यात असतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार म्हणाले, २०१७ साली आम्ही लतादीदींच्या आयुष्यावर एक विशेषांक काढला होता. ‘लता नसत्या तर’ अशी त्या अंकाची संकल्पना होती. १९४० पासून तब्बल ७० दशके लतादीदी गात राहील्या. या दरम्यान अनेक गीतकार, संगीतकार आले पण लतादीदी कायमच होत्या. प्रसिद्ध छायाचित्रकार बैजू पाटील म्हणाले, काही कार्यक्रमांच्या निमित्ताने मी लतादीदींना भेटलो. त्या निसर्गप्रेमी होत्या आणि माझे छायाचित्र पाहून त्यावर भरभरून बोलायच्या. लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये आपल्या कलेचे प्रदर्शन करणाऱ्या त्या प्रथम भारतीय आहेत. त्यानंतर माझ्या छायाचित्रांचे प्रदर्शनही तिथे भरले. तिथे लतादीदींचा फोटो पाहून मला वेगळीच ऊर्जा मिळाली होती. डॉ. रेखा शेळके यांनी लता मंगेशकरांच्या स्वर्गलोकीच्या आगमनाबद्दलच्या काही ओळी वाचून दाखवल्या. स्वर्गातील अनेक महान लोक लतादीदींचे स्वागत करण्यासाठी उत्सुक असतील, अशा ओळींमधून त्यांनी भावना व्यक्त केल्या. तर, प्रसिद्ध दिग्दर्शक शिव कदम म्हणाले, लता मंगेशकर या आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. त्या एक असा पर्व आहेत जो कधीच संपू शकणार नाही. त्यांचा मृत्यू कधीच होऊ शकत नाही कारण त्या आपल्या आवाजातून कायम आपल्यात जीवंत असतील.
The Governor of Maharashtra Hon’ble Bhagat Singh Koshyari has been on a tour of Aurangabad. Yesterday, he had invited the Vice-Chancellor of MGM University along with all the government officials of Aurangabad to the Subhedari Rest House for a meeting. As Hon’ble Vice-Chancellor Dr. Vilas Sapkal could not be present due to some reason, the Registrar Dr. Ashish Gadekar as his representative attended the meeting. Dr. Ashish Gadekar felicitated Hon’ble Governor and welcomed him on behalf of MGM University. He presented Hon’ble Governor the progress report of MGM and invited him to the university. Expressing satisfaction over the work of MGM University, the Hon’ble Governor assured that he will visit MGM University post March 2022.
महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय भगतसिंग कोश्यारी कालपासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी सुभेदारी विश्रामगृहात औरंगाबादच्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांसोबत महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठाच्या मा. कुलगुरुंना बैठकीसाठी निमंत्रित केले होते. कुलगुरू डॉ. विलास सपकाळ काही कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्याने त्यांचे प्रतिनिधी या नात्याने कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी माननीय राज्यपालांची भेट घेऊन एमजीएम विद्यापीठाच्या वतीने महात्मा गांधी यांची मूर्ती, खादीची शॉल देऊन स्वागत केले. या वेळी माननीय राज्यपालांनी एमजीएम विद्यापीठाबद्दल जाणून घेतले. डॉ. गाडेकर यांनी त्यांना एमजीएमचा वार्षिक प्रगती अहवाल सादर केला आणि विद्यापीठात येण्याचे रितसर आमंत्रण दिले. एमजीएम विद्यापीठाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत मार्च 2022 नंतर आपण एमजीएम विद्यापीठात येऊ, असे आश्वासन माननीय राज्यपालांनी या वेळी दिले.


जागतिक कर्करोग दिन विशेष
औरंगाबाद होतंय बालकर्करोगावरील उपचारांचे केंद्र एम जी. एम रुग्णालयात तीनशेहून अधिक बालके कर्करोगमुक्त
जगभरात ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. बदलत्या जीवनशैलीतून कॅन्सरचा विळखा आता आबालवृद्धांमध्ये जडताना दिसत आहे. दरम्यान दुर्धर आजारांपैकी एक म्हणून कॅन्सर कडे पाहण्याच्या दृष्टीमुळे या आजाराबाबत अनेकांच्या मनात भीती आहे. त्यामुळेच जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधत या आजाराबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे.
“कर्करोगरावर मात करुन बहुतांश बालके सामान्य आयुष्य जगू शकतात .साधारपणे ७० ते ८० प्रतिशत बालके पूर्णपणे ठीक होतात त्यासाठी लवकर निदान व उपचार होणे आवश्यक आहे . औरंगाबाद हे उभरते आणि आणि परवडणाऱ्या खर्चात बाल कर्करोग उपचाराचे प्रमुख केंद्र म्हणुन उदयास येत आहे” असा विश्वास एम.जी. एम रुग्णालयातील लहान मुलांचे रक्तविकार व कर्करोग विभागप्रमुख डॉ. तुषार इधाटे यांनी व्यक्त केला .
एम. जी. एम. रुग्णालयाने नुकताच ३०० बालरुग्णांना कर्करोगमुक्त करण्याचा टप्पा पार केला आहे त्यानिमित्ताने ते बोलत होते . डॉ इधाटे म्हणाले , “ एम .जी. एम. रुग्णालयाने पाच वर्षांपूर्वी बाल रक्तविकार व कर्करोग विभाग सुरु केला. गेल्या पाच वर्षात ३०० रुग्णांनी कर्करोग मुक्तीचा टप्पा पार केला आहे मराठवाड्यातील प्रथम हिमॅटॉलॉजि कक्ष , प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी , समाजसेवक , आहारतज्ञ् यामळे एम. जी. एम हे बाल कर्करोग उपचारांचे प्रमुख केंद्र बनले आहे.
कर्करोगाच्या उपचारामधील बहुतांश रुग्ण हे मध्यमवर्गीय किंवा ग्रामीण भागातले होते , ज्यांना अनेक आर्थिक अडचणी होत्या , त्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था व दाते खंबीरपणे उभे राहिले. पूर्णवेळ समाजसेवक असल्याने याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन लाभले . या सर्व गोष्टीमुळे कुटुंबीयांमध्ये एक नवीन आशा निर्माण झाली आणि मिळालेल्या यशामुळे कर्करोग उपचाराबद्दल विश्वास वाढला असेही त्यांनी सांगितले .
एम. जी. एम. चे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा म्हणाले , ” भविष्यात मराठवाड्यातील रुग्णांना सेवा मिळावी यासाठी वैद्यकीय सुविधा अजून अद्यावत करण्यात येतील जेणेकरून त्यांना मुंबई किंवा पुणे प्रवास करून जाण्याची गरज पडणार नाही . औरंगाबाद हे आता परवडणारे कर्करोग उपचार केंद्र म्हणून पुढे येत असुन याठिकाणी मराठवाडा , विदर्भ , खानदेश मधून देखील रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
लहान मुलांचे रक्तविकार व कर्करोग तज्ञ् डॉ. तुषार इधाटे व त्यांची टीम यांच्या यशस्वी कामगिरीबद्दल एम. जि एम. चे सचिव अंकुशराव कदम, व्हाइस चेअरमन डॉ. पी. एम. जाधव, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा , उपअधिष्ठाता डॉ.प्रवीण सुर्यवंशी व बालरोग विभाग प्रमुख डॉ माधुरी एंगाडे यांनी अभिनंदन केले आहे.
लहान मुलांच्या कर्करोगाची लक्षणे
ताप येणे, वजन कमी होणे, रक्त कमी होणे, शरीरात गाठी येणे, लाल डाग येणे, पोट फुगणे इत्यादी. अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या बालरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा. बालरोगतज्ज्ञ या लक्षणांच्या आधारावर योग्य ते तपासणी करून आपणास मार्गदर्शन करतील. |
“एम.जी.एम रुग्णालयात मागील ५ वर्षात तीनशेहुन अधिक बालरुग्णावर कर्करोगाचा यशस्वीरित्या उपचार करण्यात आला आहे . मराठवाड्यातील प्रथम हिमॅटॉलॉजी कक्ष , प्रशिक्षित नर्सेस व ज्युनियर डॉक्टर्स , समाजसेवक अशी पूर्ण टीम आमच्यासोबत काम करते . रुग्णास विविध सरकारी योजना , बिनसरकारी संस्था NGO यांच्या मार्फत निधी उपलब्ध केला जातो .समाजातील सर्व स्थरातील रुग्णांना कर्करोगावर उत्कृष्ट उपचार मिळावेत यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत “.
डॉ. तुषार इधाटे , लहान मुलाचे रक्तविकार व कर्करोग तज्ञ् |
एमजीएममध्ये आज मुकुंद कुलकर्णी करणार अर्थसंकल्पाचे विश्लेषण
महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने 2 फेब्रुवारी रोजी ‘डिकोडींग बजेट-2022’ या विषयावर प्रसिद्ध उद्योजक आणि अर्थतज्ञ मुकुंद कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहील. या व्याख्यानात मुकुंद कुलकर्णी हे २०२२ च्या अर्थसंकल्पातील विविध बाबींचे विश्लेषण करतील. एमजीएमच्या विनोबा भावे सभागृहात दुपारी १२.३० वाजता हे व्याख्यान होईल. यात सहभागी होण्याचे आवाहन एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रेखा शेळके यांनी केले आहे.
श्रद्धांजली सभेचे आयोजन
महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळींचे प्रमुख, कामगार नेते, शिक्षणतज्ञ तसेच पुरोगामी विचारवंत दिवंगत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वतीने सभेचे आयोजन केले आहे. या दिवंगत नेत्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण श्रद्धांजली सभेस उपस्थित राहावे.
वेळ: दि. 18 जानेवारी 2020, दुपारी 4 वाजता
स्थळ: चिंतनगाह, एमजीएम परिसर, एन-6, सिडको, औरंगाबाद
विद्यार्थ्यांनी केवळ परिक्षेसाठी नव्हे तर ज्ञानार्जनासाठी शिकावे
एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
पदवी आणि पदव्यूत्तर पदवी हा युवकांच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्वाचा टप्पा आहे. या काळात आपला सर्वांगिण विकास करण्याच्या उद्देशाने त्यांनी मार्गक्रमण करावे. हे सर्वांगिण, नवोन्मेषी, संशोधनाधारीत, रोजगाराभिमूख आणि अभिनव शिक्षण देण्यासाठी महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठ तत्पर आहे. येथील प्रत्येक विद्यार्थ्याला काळानुरूप तसेच इंडस्ट्रीच्या गरजेनुरूप कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी एमजीएम विद्यापीठ कायम कार्य करीत राहील. विद्यार्थीनी केवळ परिक्षेसाठी नव्हे तर ज्ञानार्जन करण्यासाठी शिकायला हवे, असे आवाहन एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी केले आहे. राष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला. या वेळी कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, परिक्षा नियंत्रक, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर प्रास्ताविकात म्हणाले की, एमजीएमसारख्या पर्यावरणपूरक, नवोन्मेषी आणि संशोधनपूरक परिसरात विद्यार्थ्यांना शिकण्यासारख्या भरपूर बाबी आहेत. येथील विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांनी येथील पायाभूत सुविधांचा वापर करून आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करावी. युवा दिनाच्या निमित्ताने त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.
कुलगुरू डॉ. विलास सपकाळ विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांनी युवकांच्या आयुष्याला आपल्या कार्यातून आणि विचारांतून नवा दृष्टीकोन दिला आहे. एखाद्या महाविद्यालयातील आणि विद्यापीठाच्या कॅम्पसमधील शिक्षणात फरक असते. यात अभ्यासक्रम हा महत्वाचा भाग असतो. तो काळानुरुप, गरजेनुरुप तसेच इंडस्ट्रीच्या मागणीनुसार सातत्याने अद्ययवात होत राहायला हवा. एमजीएम विद्यापीठाने हे सूत्र अंगीकारले आहे. नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, अभिनव अध्यापनपद्धती, परीक्षा पद्धती तसेच सातत्यपूर्ण मुल्यमापनाच्या आधारे एमजीएम विद्यापीठात विद्यार्थ्यांची प्रगती जपली जाते. येथे एकाच छताखाली विविध शाखांचे शिक्षण असल्याने विद्यार्थ्यांना आंतरशाखीय आणि बहूशाखीय शिक्षण घेता येते. खादी, पॉटरी, बिदरी, फोटोग्राफीसारख्या अभ्यासक्रमातून प्रत्यक्ष काही कौशल्ये शिकता शिकता अवगत करता येते. विद्यापीठीय संशोधन फार महत्वाचे असते. त्यामुळे येथे नवनवीन संकल्पना तयार व्हाव्यात, त्या संकल्पनांचे उपयोजन व्हावे आणि त्यातून संशोधन व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. येथील विद्यार्थ्यांनी नोकरी, व्यवसायासोबतच उद्योजकतेचाही विकास करावा यासाठी प्रोत्साहन दिले जाते. इन्क्यूबेशन, इनोव्हेशन अँड रिसर्च सेंटर (आयआयआरसी) येथे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. त्यातून कोणत्याही विद्याशाखेचे विद्यार्थी आपल्या कल्पनांना तंत्रज्ञानाची जोड देऊ शकतात. स्पर्धा परीक्षा केंद्र, उद्योजकता प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून उत्तम अधिकारी तसेच उद्योजक घडवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत कोणतेही अडथळे असून नयेत आणि त्यांना सर्वांगिण शिक्षण मिळावे, यासाठी दूर दृष्टीकोन असणारे कुलपती अंकुशराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे. एमजीएम विद्यापीठाने नव्या शैक्षणिक धोरणाची कास धरली असून त्यानुसार क्रेडीट बेस्डपद्धती आणली आहे. शिवाय, कोर्सेरासारख्या वैश्विक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. विद्यार्थ्यांनी एमजीएमच्या या सर्व उपक्रमांचा उपयोग करून घेत कौशल्य अंगीकारावे आणि आपले आयुष्य समृद्ध करावे, अशा शुभेच्छाही डॉ. विलास सपकाळ यांनी या वेळी दिल्या. त्यानंतर विविध नवोपक्रम, सोईसुविधा आदींबद्दल अजय धनजे, दीक्षा सोनवणे, वैभव पवार या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. डॉ. आशा देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान शिष्टमंडळाची एमजीएम विद्यापीठास भेट
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठास भेट देऊन येथील शैक्षणिक आणि संशोधनात्मक कार्याचे कौतुक केले. या शिष्टमंडळात विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, सदस्य राजीव मोतीलाल शाह, किरण बी.गुजर, अधिष्ठाता कर्नल शिरीष कंभोज, डॉ. बीजकर, कृषी विभाग ट्रस्ट मालेगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.निलेश नलावडे यांचा समावेश होता. यावेळी एमजीएम विद्यपीठाचे कुलपती अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, भाऊसाहेब राजळे, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, निलेश राऊत, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते.
या शिष्टमंडळाने विद्यापिठातील अत्याधुनिक इन्क्युबेशन, इन्नोव्हेशन अँड रिसर्च सेंटर (आयआयआरसी), खादी निर्मिती केंद्र, एमजीएम रेडिओ आणि फिल्म विभाग आदी ठिकाणी भेट दिली. यावेळी कुलपती अंकुशराव कदम यांनी महात्मा गांधी मिशनची सुरुवात ते एमजीएम विद्यापीठापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितले. ते म्हणाले, शरद पवार यांच्या मार्गदर्शनातुन ही संस्था उभी राहिली. विद्यापीठाच्या माध्यमातून आता आम्हाला अभ्यासक्रम तयार करता येतात आणि ते राबवताही येतात त्यामुळे त्यात नाविन्यता आणि संशोधनदृष्टी विकसित झाली. याचा फायदा शिक्षक आणि विद्यार्थी दोन्हीही घटकांना होत आहे. विद्या प्रतिष्ठान बारामतीचे उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे यांनी आपण एमजीएमच्या वतीने करण्यात आलेल्या आदरातिथ्याने भारावलो असल्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले, बारामतीत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची संकल्पना राबवायची असे शरद पवार यांनी महिन्याभरापूर्वी सुचवले आणि दोन दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला की, ही संकल्पना औरंगाबादच्या एमजीएम विद्यापीठात राबवली जात आहे. आता साक्षात शरद पवारांनी सुचवल्यामुळे आम्हाला एमजीएमची क्षमता किती व्यापक आहे, हे कळले. आज याठिकाणी आम्ही प्रत्यक्ष येऊन पाहिल्यानंतर तर आम्ही भारावून गेलोय की इथं खूप काही नाविन्यपूर्ण आहे. पॉटरी, बिदरी, टेक्स्टाईलमधील अनेक नाविन्यपूर्ण बाबीतून येथील कृत्रिम बुद्धीमत्तेचे पारंपरिक महत्वही लक्षात येते.
दरम्यान, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी एमजीएम विद्यापीठाचे भविष्यकालीन दृष्टिकोन मांडले. ते म्हणाले, आंतरशाखीय आणि बहुशाखीय शिक्षणाच्या माध्यमातून कुशल विद्यार्थी घडवण्याचा आमचा मानस आहे. कोणतेही एआय तंत्रज्ञान स्वबळावर तोपर्यंत प्रभावी ठरू शकत नाही जोपर्यंत त्याला बहुशाखीय दृष्टीकोनाची जोड नसते.विद्यापीठात सर्व एक्स्पर्ट एकाच ठिकाणी असल्याने विद्यापीठात सेंटर ऑफ एक्सलेन्स सहज सुरू होऊ शकते. केवळ संशोधन नव्हे तर त्याच्या उपयोजनावर भर देण्याकडे आमचा कल आहे, असेही कुलगुरू म्हणाले. महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त प्रतापराव बोराडे यांनीही मनोगत व्यक्त केले. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फर्मेशन, कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजीच्या शर्वरी ताम्हणे यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे सध्याच्या काळातील महत्व विशद करत एमजीएम राबवत असलेले एआयआधारित अभ्यासक्रम आदींची माहिती दिली. तर डॉ.नितीन फाफट यांनी एमजीएम आयआयआरसीमधील विविध तंत्रज्ञानाची माहिती दिली. येथील आयआयआरसीमध्ये मार्ग दाखवण्यासाठी बनवलेले रोबोगाईड, चालकांना वाहन चालवताना मार्गदर्शन करणारे सॉफ्टवेअर, अडिटीव्ह मॅनुफॅक्चरिंग, इंडस्ट्रीयल रोबोटिक्स, इंडस्ट्रियल हायड्रोलिक्स अँड न्यूमॅटिक्स, इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड ड्राईव्ह, कर पार्किंग सिस्टीम, कम्प्युटर इंटग्रेटेड मॅनुफॅक्चरिंग, मानवविरहित हवाई वाहने, 32 कार्यशाळा आदी अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध असून त्याचा विद्यार्थी कौशल्य विकासासाठी उपयोग करून घेत असल्याचे त्यांनी सांगितले. एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर यांनी प्रास्ताविक तर डॉ.परमिंदर कौर यांनी सूत्रसंचालन केले. विद्या प्रतिष्ठाणच्या शिष्टमंडळाने युडीआयसीटी आणि आयआयआरसीला प्रत्यक्ष भेट देत तेथील प्रयोगांची माहिती जाणून घेतली.
नाविन्यपूर्ण उपक्रम व संशोधनासाठी शरद पवारांकडून एमजीएमला दोन कोटींची मदत सुपूर्द
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी महात्मा गांधी मिशनमधील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना संशोधन तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने नुकतीच दोन कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. या निधीचा धनादेश शरद पवारांनी बुधवारी महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम आणि सचिव अंकुशराव कदम यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश राऊत उपस्थित होते. १ जानेवारी रोजी महात्मा गांधी मिशनच्या ३९व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे तसेच एमजीएम विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी महात्मा गांधी मिशनने सेवा, शिक्षण आणि संशोधनात आजवर केलेल्या कामाचे कौतूक केले होते. या संस्थेतून अधिक दर्जेदार संशोधन तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांची निर्मिती व्हावी. त्यासाठी प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी, या हेतूने शरद पवारांनी संस्थेला दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. या घोषणेची तत्काळ पूर्तता करत त्यांनी बुधवारी दोन कोटींचे धनादेश कमलकिशोर कदमआणि अंकुशराव कदम यांच्याकडे दिला. या प्रोत्साहन उपक्रमांसाठी एक कोटी रुपयांचा निधी बी.जी.शिर्के कनस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा.लि. व एक कोटी रुपयांचा निधी पंचशील फाउंडेशन, पुणे या दोन संस्थांनी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या व्याजातून प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

भारतीय पत्रकारितेच्या गौरवशाली परंपरेत मराठी पत्रकारिता अग्रस्थानी
एमजीएममध्ये आयोजित मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात तज्ञांची भावना
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राजा राममोहन रॉय यांच्यापासून महात्मा गांधीपर्यंत सर्वांनीच पत्रकारितेच्या माध्यमातून मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यकालीन पत्रकारीतेला ध्येय होते मात्र सध्याची पत्रकारिता व्यवसायवादी बनली आहे. त्यामुळे यात ध्येयवादी तफावत मोठी आहे. भारतीय पत्रकारितेच्या गौरवशाली परंपरेमध्ये मराठी पत्रकारितेचे योगदान अमूल्य असून ते कायम अग्रस्थानी आहे, अशी भावना एमजीएममध्ये आयोजित दर्पण दिन आणि मराठी पत्रकारिता दिनाच्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केली. महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठाचे वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दर्पण दिन तसेच मराठी पत्रकारिता दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या वेळी माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. जी. सुरेश, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार, ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर, महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त प्रतापराव बोराडे, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रेखा शेळके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद विभागप्रमुख डॉ. दिनकर माने यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख अतिथी डॉ. के. जी. सुरेश म्हणाले, पत्रकारितेचा धर्म, पक्ष व लक्ष्य समाजात परिवर्तन करणे असावा. स्वातंत्र्यकाळात पत्रकारितेपुढे निश्चित ध्येय होते आणि त्याकालीन सर्वच पत्रकारांनी ते जपले. आता पत्रकारिता व्यवसायवादी झाली आहे. या व्यवसायवादात पत्रकारांनी समाजाची बाजू घ्यायला शिकले पाहिजे. त्यांनी पक्षकार बनू नये तर पत्रकारच बनावे. सध्याच्या काळात माध्यम साक्षरतेचीही मोठी गरज आहे. पं. बाळशास्त्री जांभेकरांनी सामान्य माणसांच्या मनात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी दर्पणच्या माध्यमातून कार्य केले, अशी भावनाही सुरेश यांनी केली.
प्रमुख वक्ते प्रशांत पवार यांनी भगतसिंगांनी लिहिलेल्या उताऱ्यांचे दाखले देत आधुनिक पत्रकारितेची मांडणी केली. ते म्हणाले, भगतसिंगांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच पत्रकारितेची सुरुवात केली. मवाला या वृत्तपत्रापासून त्यांनी लेखनाची सुरुवात केली तर प्रताप या दैनिकात त्यांनी बलवंतसिंग टोपणनावाने लेखन केले होते. त्यांनी लिहिलेले सर्व अग्रलेख आजच्या काळातही लागू पडते. ते समाज, सरकार आणि विद्यार्थ्यांसाठीही तितकेच महत्वाचे आहे.
कुलगुरू डॉ. विलास सपकाळ म्हणाले, सध्या सर्वत्र मोठे परिवर्तन होत आहे. पत्रकारितेत विचार प्रक्रियेच्या माध्यमातून जर स्टार्ट्अप्स सुरू झाले तर त्याचा फायदा होऊ शकतो. अवघ्या ३४ वर्षांत पं.बाळशास्त्री जांभेकरांनी जे लिहिले ते शतकभरानंतर आजही लागू पडतात. आपण त्यापासून शिकायला हवे. पत्रकारिता ही कला आणि शास्त्र दोन्हीही आहे. त्यामुळे उदयोन्मुख पत्रकारांनी त्याकडे दोन्ही अंगांनी बघावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर म्हणाले, स्वातंत्र्यकालीन पत्रकारितेपुढे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सहकार्य करण्याचे ध्येय होते. स्वातंत्र्य मिळवण्याच्या जनजागृतीत त्यांचे मोलाचे सहकार्य होते. मात्र, स्वातंत्र्यानंतर भारतीय पत्रकारितेची शैली बदलत गेली आणि सध्याच्या पत्रकारितेचा तर तोलच ढासळलाय. स्वातंत्र्यकालीन राष्ट्रभावना स्वातंत्र्यानंतर राजकीय पक्षांनी धुळीस मिळवून टाकली आणि नंतर ती आपापल्या सोईने वापरणे सुरू केले. आज ज्या राष्ट्रभावनेची चर्चा केली जाते ती धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक आदींमध्ये विभागलेली आहे. आजच्या पत्रकारांनी जागरुक राहून याचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘एमजीएम संवाद’ या नियतकालिकाचे या वेळी प्रकाशन करण्यात आले. डॉ. रेखा शेळके यांनी प्रास्ताविक तर प्रा. दिव्या कांबळे यांनी सूत्रसंचलन केले.

मा. श्री शरद पवारांकडून संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी दोन कोटींचा निधी प्राप्त
महात्मा गांधी मिशन संस्थेच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्यात आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेबांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ मिळावे यासाठी दोन कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती.त्यानुसार बुधवारी (दि.५)मुंबईत त्यांनी सदरील रकमेचे धनादेश संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम व सचिव अंकुशराव कदम यांच्याकडे सुपूर्द केले, यावेळी नीलेश राऊत उपस्थित होते.
या प्रोत्साहन उपक्रमांसाठी एक कोटी रुपयांचा निधी बी.जी.शिर्के कनस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा.लि. व एक कोटी रुपयांचा निधी पंचशील फाउंडेशन,पुणे या दोन संस्थांनी उपलब्ध करून दिला आहे.या निधीच्या व्याजातून वरील उपक्रमांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाईल.
Foundation day program and MGM university building inauguration program.
*शैक्षणिक क्षेत्रातले दुःख दूर करण्याचे काम महात्मा गांधी मिशन करत आहे*
*एमजीएमचा वर्धापन आणि विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या उदघाटनप्रसंगी शरद पवार यांचे गौरवोद्गार*
भगवान गौतम बुद्धांनी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी सर्वस्व त्यागले. महात्मा गांधीही जनतेचे दुःख दूर करण्याचे काम करत राहिले. भगवान बुद्धांचे आणि बापूंचे विचार आणि मूल्य अंगीकरून महात्मा गांधी मिशन ही संस्था शैक्षणिक क्षेत्रातील दुःख दूर करण्याचे काम करत आहे, याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी मिशनचा (एमजीएम) ३९ वा वर्धापन दिन कार्यक्रम आणि एमजीएम विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, आ.विक्रम काळे, खासदार इम्तियाज जलील, महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, सचिव आणि एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, विश्वस्त सुधीर कदम, नितीन कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, एमजीएम आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी, कृषिभूषण विजयअण्णा बोराडे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, रंगनाथ काळे, भाऊसाहेब राजळे, डॉ.नामदेवराव गाडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार शरद पवार यांनी ऑनलाईन पद्धतीने एमजीएम विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या कोनशीलेचे अनावरण केले. तर, मंत्री राजेश टोपे यांनी फित कापून इमारतीचे उदघाटन केले. शरद पवार पुढे म्हणाले, 40 वर्षांपूर्वी महात्मा गांधी मिशन संस्थेची पायाभरणी झाली. दिवस कसे निघून जातात हे कळत नाही पण या काळात बरच काही नवे उभे करता येऊ शकते, हे एमजीएमने दाखवून दिले. एमजीएम केवळ काही भागापूरतेच मर्यादित राहील नाही तर देशाच्या राजधानीजवळ नोएडातही दर्जेदार शिक्षण देत आहे. देशविदेशात येथील विद्यार्थी भरीव योगदान देत आहेत. आम्हाला हे विद्यार्थी भेटून एमजीमचे असल्याचा उल्लेख करतात तेव्हा खूप अभिमान वाटतो. दर्जेदार शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आणि संकटग्रस्तांना मदत करण्याचे मोलाचे कामही संस्था तितक्याच आपुलकीने करत आहे. कोरोनाकाळात एमजीएम रुग्णालयाने स्वतः पुढाकार घेत ज्याप्रकारे रुग्णसेवा केली ती वाखाणण्याजोगीच आहे. एमजीएमने लावलेल्या रोपट्याचे मोठ्या वृक्षात रुपांतर झाले आणि त्याची छाया समाजाच्या उपेक्षित घटकांना मिळत आहे. गांधीयन हे विचार आता जगभरात पोहोचले असून या विचारानेच महात्मा गांधी मिशन आधीपासूनच प्रेरीत झाली आहे. संस्थेचे काम गांधीजींच्या विचाराने चालत असल्याचे अभिमान वाटते, असे गौरवोद्गारही शरद पवारांनी या वेळी काढले.
प्रमुख अतिथी राजेश टोपे म्हणाले, कमलकिशोर कदम यांची दृष्टी आणि अंकुशराव कदम यांच्या कृतीतून एमजीएमचे विश्व साकारले गेले आहे. शरद पवारांनी पुस्तकांपेक्षा जास्त माणसे वाचली आहेत म्हणूनच त्यांना चालतेबोलते विद्यापीठ म्हटले जाते. हे चालतेबोलते विद्यापीठ दुसऱ्या विद्यापीठाचे मनभरून कौतुक करते, यातच त्याचे यश दडलेले आहे. शिक्षणाच्या नवनवीन दालनांची मागणी लक्षात घेऊन त्याचा अचूक वेध घेत एमजीएमने प्रगती साधली आणि सर्व पद्धतीच्या शिक्षणाचे जाळे निर्माण केले आहे. विद्यार्थी केंद्रीत, सर्वसमावेशक, भविष्यकेंद्रीत शिक्षण तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानके ही एमजीएम विद्यापीठाची वैशिष्ट्ये आहेत, अशा शब्दांत त्यांनी एमजीएमच्या कामाचे कौतुक केले.
प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम म्हणाले, खेडोपाड्यातील विद्यार्थी, रुग्णांसाठी एमजीएम नेहमीच आशेचे केंद्र राहीले आहे. माणसांचे दू:ख दूर करण्याचे गौतम बुद्धांचे व्रत आम्ही अंगिकारले आणि त्यावर वाटचाल करत आहोत. यासाठी शरद पवारांचे नेहमीच पाठबळ मिळाले. दरम्यान, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी एमजीएम विद्यापीठाच्या निर्मितीमागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, शरद पवारांचे आम्हाला नेहमीच सहकार्य मिळाले. ज्याठिकाणी कोणताही विषय वर्ज्य नाही, असे विद्यापीठ आम्हाला उभे करायचे होते. सर्व विद्याशाखांचे एकत्रित देण्यासाठी या विद्यापीठाची उभारणी केली. बुद्धांच्या विचारांनुसार, आपल्या शरीराने आणि वाणीने कुणालाही दु:ख देऊ नये, इतरांना सुख द्यावे आणि आपले चित्त सतत स्वच्छ करत राहावे. एमजीएम विद्यापीठानेही हेच धोरण अवलंबून विद्यार्थी घडवावे, असा आमचा मानस आहे.
कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी एमजीएम विद्यापीठाच्या पुढील वाटचालीची मांडणी केली. ते म्हणाले, एमजीएम विद्यापीठात सध्या २८१ अभ्यासक्रम असून त्यात २१८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. आंतरविद्याशाखीय तसेच बहुविद्याशाखीय शिक्षणासाठी आमचा आग्रह असून शिक्षणात वैविध्यता आणण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नरत असणार आहे. जागतिकस्तरीय सहकार्य, उपयुक्त संशोधन तसेच गुणवत्तापूर्ण अध्ययनाच्या त्रिसुत्रीवर विद्यापीठाचे पुढे भर असेल. सर्वांगिण विकासाने परिपूर्ण विद्यार्थी येथून शिकून बाहेर पडावा, यासाठी विद्यापीठाचे पुरेपुर प्रयत्न असणार आहेत.
दरम्यान, या वेळी महात्मा गांधी मिशनच्या संपूर्ण वाटचालीवर आधारीत चित्रफित दाखवण्यात आली. महात्मा गांधी मिशन आणि एमजीएम विद्यापीठचे वार्षिक अहवाल, एमजीएमची गृहपत्रिका गवाक्ष, वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले एमजीएम इन्स्पायर, एमजीएम व्हिस्टा, एमजीएम क्लिन इंडिया या नियतकालिकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. आशा देशपांडे, देवाशिष शेडगे, डॉ. परमजीत कौर यांनी केले. तर एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी आभार मानले.
*नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी शरद पवारांकडून २ कोटी रुपयांचा निधी*
खासदार शरद पवार यांनी या वेळी एमजीएम विद्यापीठाला दोन कोटी रुपयांचा निधी जाहिर केला. यापैकी १ कोटी रुपये प्राध्यापकांतील नाविन्यतेला आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी तर १ कोटी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपन्नतेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी वापरले जावे. या निधीच्या व्याजाच्या रकमेतून प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करावी, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
*विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून घडले लोककलेचे दर्शन*
या वेळी महात्मा गांधी मिशनअंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. महाराष्ट्रातील लोककला, लोकसंगीतावरील अॅरोबिक्स, गवळणी, जिम्नॅस्टीक्स, ग्रामीण भागातील लोकजीवन, योगा आदींचा या सांस्कृतिक कार्यक्रमात समावेश होता. दरम्यान, कोरोनाकाळात काम करणाऱ्या योद्धांच्या सन्मानार्थ सादर केलेल्या पोवाड्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. भक्ती बनवसकर, राहुल खरे, श्रीकांत गोसावी, धुमाळ बंधू या गायकवृंदासह प्रा. शिव कदम, योगिनी देशमुख, जाई कदम, सिद्धीका दळवी, एमजीएमचे विद्यार्थी, प्राध्यापक आदींनी या सांस्कृतिक कार्यक्रमाची मांडणी केली होती.
एमजीएम विद्यापीठात राष्ट्रीय गणित दिवस साजरा
भारताचे प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त एमजीएम विद्यापीठामध्ये गणित दिवस साजरा करण्यात आला. गणित दिवसाच्या निमित्ताने पोस्टर सादरीकरणाचेही आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, डॉ. व्ही. बी. मुसांडे (उपप्राचार्य, जेएनईसी) डॉ.व्ही.एम.आरोळे (प्रमुख, उपयोजित विज्ञान विभाग) डॉ. गजानन लोमटे (समन्वयक, रामानुजन क्लब) यांच्या उपस्थितीत पार पडले. गणित दिवसाच्या निमित्ताने आयोजित पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे परीक्षण डॉ. शुध्दशील घोष, डॉ. सदानंद गुहे आणि डॉ. अरविंद चेल यांनी केले. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त मिळाला. डॉ. गजानन लोमटे, डॉ. टी. एस. पवार, डॉ. एन. जी. अबुज, प्रा. एस. के. काळे, प्रा.सिंधू ढवळे , प्रा. यू. व्ही. देशमुख यांच्यासह विद्यार्थी समन्वयक अभिषेक गव्हाणे, शौर्य गोजे, अनुराग निलावार, सॅम करिवर्धन, आदित्य चव्हाण, अब्दुल मोईद, प्रांजल पाटील, खतीब अदनान आदींनी कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

भोवतालच्या कचऱ्यात समाजाचे प्रतिबिंब दिसते, त्याचे दर्शन छायाचित्रातून होते
पद्मश्री सुधारक ओलवे यांची एमजीएमच्या व्याख्यानात भावना
समाजातील कचरा, घाण साफ करण्याचे काम स्वच्छता कर्मचारी अहोरात्र करत असतात. वास्तवात या कचऱ्यातच समाजाचे प्रतिबिंब लपलेले असते. अशाच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामांबाबत घेतलेल्या छायाचित्रांमधून या वास्तवाचे दर्शन घडते. माणसे चंद्रावर पोहोचलीत पण अजूनही समाजातील विषमता आपल्याला दूर करता आली नाही, अशा शब्दांत पद्मश्री सुधारक ओलवे यांनी समाज आणि छायाचित्रणासंदर्भातील चौकट स्पष्ट केली. एमजीएम विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फोटोग्राफीच्या वतीने आयोजित फोटोग्राफी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मुक्तसंवाद साधताना ते बोलत होते. या वेळी महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त प्रतापराव बोराडे, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, डॉ. आशिष गाडेकर, प्रा. रेखा शेळके, एमजीएम फोटोग्राफी विभागप्रमुख बैजू पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर, प्रा.जयदेव डोळे आदी उपस्थित होते.
सुधारक ओलवे यांनी समाजातील विविध समस्यांवर छायाचित्रण केले आहेत. याशिवाय, विविध वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी छायाचित्रकार म्हणून काम केले आहे. दिल्ली, मुंबईसह स्वीडन, लिस्बन, अॅमस्टरडॅम, लॉस एंजिलिस, वाँशिग्टन आदी विदेशातील शहरांमध्येही त्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. २०१६ साली भारत सरकारने त्यांचा पद्मश्री या बहुमानाने गौरव केला आहे. त्यांनी उपासमारी, कुपोषण, बालविवाह व त्याचे परिणाम, स्त्री-भ्रूणहत्या, सफाई कामगार व त्यांची व्यथा, बलात्कार तसेच अॅसिड हल्ला पीडित आदींच्या संदर्भातील छायाचित्रांच्या मालिका कॅमेऱ्यातून टिपल्या आहेत. या मालिकेतील विविध छायाचित्रांचे प्रदर्शन एमजीएममध्ये आयोजित करण्यात आले होते. या निमित्ताने ओलवे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, समाजातील अनेक घटना, घडामोडी तसेच कामे चिंतनीय आहेत. स्वच्छता कर्मचारी हा जनता झोपेत असताना संबंधीत भागाची सफाई करून जातो. या दरम्यान त्याला घाणीत राहून काम करावे लागते. त्यांच्या प्रत्येक छबी समाजासमोर एक वेगळा वास्तव मांडतात. एकीकडे माणसे चंद्रावर पोहोचली पण अद्यापही दुसरीकडे अनेकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. आजच्या आधुनिक जगातदेखील समाजातील एक विषमता आपल्याला दिसून येते. ही शरमेची बाब असून ती नष्ट व्हायला हवी. दरम्यान, या छायाचित्रांच्या वेगवेगळ्या मालिका कॅमेऱ्यात टीपत असताना अनेकदा जीवही धोक्यात घालावा लागल्याची भावना ओलवे यांनी व्यक्त केली. डॉ. विलास सपकाळ यांनी प्रास्ताविकात म्हटले की, मानवी जीवन जगण्याच्या पद्धतीत प्रचंड बदल झालेले असून त्याच्याशी समरस होण्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमतेसोबतच भावनिक क्षमताही फार महत्वाची असते आणि छायाचित्रांमधून या भावना प्रतित होत असतात. आपण पर्यावरणाच्या अर्थचक्राचा भाग आहोत. त्यामुळे त्याप्रती जागरूक असणे फार महत्वाचे आहे. फोटोग्राफी ही कला आपल्याला अंतर्भूत करायला लावते आणि सुधारक ओलवेंसारख्या जागतिक स्तरावरील छायाचित्रकारांशी संवादातून आपल्याला समाजातील एक वेगळे विश्व अनुभवायला मिळते, अशी भावना डॉ. सपकाळ यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन यश घाटगे यांनी तर आभार बैजू पाटील यांनी मानले.
अभिरूप युवा संसद स्पर्धेत एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाची विजेतेपदाची हॅटट्रीक
युवक बिरादरीद्वारा आयोजित स्पर्धेत सहापैकी तीन उत्कृष्ट संसदपटूचे पुरस्कारही पटकावले
युवक बिरादरीच्या (भारत) वतीने आणि एमजीएम विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित अभिरूप युवा संसदेच्या मराठवाडा विभागीय फेरीत एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावत एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपदाची हॅटट्रीक साधली आहे. लातूरच्या दयानंद महाविद्यालयाच्या संघाने द्वितिय, तर बीडच्या एसकेएच मेडिकल कॉलेजच्या संघाने तृतीय पुरस्कार पटकावले. दरम्यान, स्पर्धेतील सहा वैयक्तिक पुरस्कारांपैकी तीन उत्कृष्ट संसदपटूचे पुरस्कारही या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटकावले. महात्मा गांधी मिशन ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव बोराडे, युवक बिरादरीचे उपाध्यक्ष आशुतोष शिर्के, प्रशांत वाघाये, परिक्षक अॅड. राज कुलकर्णी, डॉ. रेखा शेळके यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण झाले.
एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात अभिरुप युवा संसदेच्या मराठवाडा विभागीय फेरीचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत मराठवाड्यातून दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स (लातूर), डॉ. जी.वाय.पाथ्रीकर कॉलेज (औरंगाबाद), एमएसएस कॉलेज (अंबड), एसकेएच मेडीकल कॉलेज (बीड) आणि एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या संघांचा समावेश होता. कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, आशुतोष शिर्के, प्रशांत वाघाये, अॅड. राज कुलकर्णी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. संविधान पुजन आणि उद्देशिकेच्या वाचनाने स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत विविध संघांनी कोविड स्थिती, शेतकरी आंदोलन, राजकीय आरक्षण, क्रीप्टोकरन्सी आदींबाबत प्रश्न तसेच विधेयकांची मांडणी केली. विजेत्या एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाकडून अथिरा मनिकंडन हिने अनिवार्य लैंगिक शिक्षण हे खाजगी विधेयक मांडत प्रेक्षकांची मने जिंकली. तर, किरण गीते हिने माहवारी व्यवहार परिवर्तन विधेयकाच्या माध्यमातून स्त्रियांच्या मासिक पाळीसंदर्भात अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. विविध आस्थापनांमध्ये कार्यरत स्त्रियांना या काळात रजेसह अन्य सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात या विधेयकाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली. तर, याच कॉलेजच्या सत्ताधारी गटाने राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी आणलेल्या विधेयकावर संसदेत जोरदार खडाजंगी झाली आणि अखेरीस विरोधकांच्या प्रखर विरोधासमोर सरकारला माघार घ्यावी लागली. उत्तम संकल्पना, विधेयकांची मांडणी आणि सादरीकरणाच्या बळावर एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या संघाने तिसऱ्यांदा प्रथम पुरस्कारावर बाजी मारली. विजेता संघ आणि उत्कृष्ट संसदपटू पुढच्या फेरीत मुंबईत सादरीकरण करतील. या स्पर्धेचे सुत्रसंचलन प्रा.विवेक राठोड, ऋत्विक बारी आणि वैष्णवी नाईक यांनी केले.
तृतीयपंथी सभापतीने वेधले लक्ष
स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघातील विद्यार्थ्यांनी देशातील विविध भागांचा प्रतिनिधित्व करत विविधांगी वेशभूषा केली होती. अंबडच्या संघाने महिला पंतप्रधान तर लातूरच्या संघाने महिला सभापती नेमून दर्जेदार मांडणी केली. मात्र, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या संघाने तृतीयपंथी सभापतींची नेमणूक करत अत्यंत भन्नाट सादरीकरण केले. सुरज पटके या विद्यार्थ्याने ही तृतीयपंथी सभापतीची भूमिका लिलया साकारली आणि त्यासाठी त्याला ‘उत्कृष्ट सभापती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सांघिक पुरस्कार
प्रथम- एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय, औरंगाबाद
द्वितिय- दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स, लातूर
तृतीय- एसकेएच मेडिकल कॉलेज, बीड
उत्कृष्ट संसदपटू
प्रिया पवार, एसकेएच मेडिकल कॉलेज, बीड
मेघराज शेवाळे, दयानंद कॉलेज, लातूर
दिव्या निचळ, एमएसएस कॉलेज, जालना
अथिरा मनिकंडन, एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय, औरंगाबाद
किरण गीते, एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय, औरंगाबाद
सय्यद अजहर सिद्दीकी, डॉ. जी.वाय.पाथ्रीकर महाविद्यालय, औरंगाबाद
उत्कृष्ट सभापती
सुरज पटके, एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय, औरंगाबाद
एमजीएमध्ये इंडियन मॅथेमॅटीकल सोसायटीच्या वार्षिक जागतिक परिषद संपन्न
४ ते ७ डिसेंबरदरम्यान पार पडली परिषद, जगभरातील तज्ञांचा सहभाग
एमजीएम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (जेएनईसी) अप्लाईड सायन्स विभागाच्या वतीने इंडियन मॅथेमॅटीकल सायन्सच्या (आयएमएस) ८७व्या आंतरराष्ट्रीय वार्षिक परिषदेचा मंगळवारी समारोप झाला. ४ ते ७ डिसेंबरदरम्यान ऑनलाईन पद्धतीने ही परिषद पार पडली. त्यात जगभरातील तज्ञांचा सहभाग होता.
या परिषदेमध्ये १२० शोधनिबंध, ९ निमंत्रित व्याख्याने आणि नामांकित तज्ञांचे ६ परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. आयआयटी मुंबईचे प्रा. दिपेंद्र प्रसाद, डॉ . श्रीराम निंभोरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ दिल्लीच्या प्रा. गीता व्यंकटरमन, सौराष्ट्र विद्यापीठ राजकोटचे प्रा.समीर के.वैद्य, सर्बन विद्यापीठ, पॅरिसचे प्रा. मायकल वाल्ड्स्मिड्टयांनी परिसंवादात सहभाग घेतला. आयएमएस ही सर्वात जुनी आणि सर्वाधिक सदस्य असलेली सोसायटी असून जगभरात त्यांच्याकडून दरवर्षी परिषदांचे आयोजन केले जाते. यंदा हा बहुमान एमजीएम विद्यापीठाला मिळाला होता. ४ डिसेंबर रोजी आयएमएसचे अध्यक्ष प्रा.दिेपेंद्र प्रसाद, आयआयएससी बंगळुरूचे प्रा.ए.के.नंदकुमारन, महासचिव प्रा. सत्य देव, अकॅडमिक सेक्रेटरी प्रा. पियूश चंद्रा (आयआयटी मुंबई), एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर चार दिवस गणितीय संशोधनासंदर्भात विविध चर्चासत्रांमध्ये व्यापक चर्चा झाली. जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील अप्लाइड सायन्स विभागातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी कुलपती अंकुशराव कदम, विश्वस्त प्रताप बोराडे, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, प्राचार्य डॉ. एच. एच. शिंदे, उपप्राचार्य डॉ. विजया मुसांडे यांचे मार्गदर्शन लाभले. समन्वयक डॉ. विनिता आरोळे, आणि डॉ. गजानन लोमटे यांच्यासह डॉ. शुध्दशील घोष आणि तांत्रिक समिती सदस्य डॉ. क्रांती झाकडे, डॉ. आशिष इटोलीकर, डॉ. सूर्यकांत सपकाळ, डॉ. नारायण अबुज, प्रा. साईनाथ काळे, प्रा. उत्तरा देशमुख, प्रा. सुजीत मोरे , प्रा.योगेश तायडे, प्रा.अमोल महाडिक, प्रा.अतुल दुसाने, प्रा.तुषार मोहिजे, डॉ. सुरेखा देशमुख यांनी परिषद यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .



एमजीएम ऑलिम्पिक्समध्ये जेएनईसीला सर्वसाधारण विजेतेपद
तीनदिवसीय क्रीडा महोत्सवाचा पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या उपस्थितीत समारोप
महात्मा गांधी मिशनच्या (एमजीएम) वतीने आयोजित तीनदिवसीय एमजीएम ऑलिम्पिक्स स्पर्धेत जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाने (जेएनईसी) विजेतेपद तर एमजीएम पॉलिटेक्निक महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकावले. तर, अभ्यासपूरक उपक्रमांत एमजीएम कॉलेज ऑफ नर्सिंग एज्युकेशनने विजेतेपद आणि एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकावले.
शुक्रवारी एमजीएम स्टेडिअमवर पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत एमजीएम ऑलिम्पिक्सचा बक्षिस वितरण सोहळा पार पडला. या वेळी एमजीएमचे सचिव आणि एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, एमजीएम ऑलिम्पिक्सचे संयोजक कर्नल प्रदीपकुमार यांच्यासह सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. उपायुक्त गिऱ्हे म्हणाले, खेळाइतकी सुंदर संकल्पना अन्य कोणतीही नाही. त्यात कोणत्याच भाषेची किंवा माध्यमांची अडचण नसते. आपल्या मुलांना आपण मातीत खेळू द्यायला हवे. त्यांना मैदानावर झालेली जखमही महत्वाची असते. कारण, रक्त मातीत मिसळल्यावरच खरा विकास होतो. एमजीएमच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासोबतच शारीरिक विकासासाठीही इतक्या भव्य स्पर्धांचे आयोजन केल्या जाते, हे कौतुकास्पद आहे. एमजीएम ऑलिम्पिक्समधून उद्याचे उत्तम खेळाडू घडतील, अशी आपल्याला अपेक्षा असल्याचेही गिऱ्हे म्हणाले.
एमजीएम ऑलिम्पिक्स स्पर्धेत एमजीएम संस्थेअंतर्गत कार्यरत नांदेड, परभणी, औरंगाबाद, नवी मुंबई आणि नोएडा येथील विविध महाविद्यालयांतील सुमारे ६०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, खोखो या सांघिक खेळासोबतच बॅडमिंटन, लॉन टेनिस, टेबल टेनिस, अॅथलेटीक्स, थ्रो बॉल आणि योगा या वैयक्तिक प्रकारांतील खेळांचाही समावेश होता. जेएनईसीच्या संघाने व्हॉलीबॉल, कबड्डी (पुरुष), बास्केटबॉल (महिला आणि पुरुष) या खेळांचे विजेतेपद पटकावले. त्यामुळे जेएनईसीला एमजीएम ऑलिम्पिक्सचे सर्वसाधारण विजेतेपद प्रदान करण्यात आले. तर, एमजीएम पॉलिटेक्नीक कॉलेजच्या संघाने खो-खो (महिला), टेबल टेनिस (महिला) या खेळांचे विजेतेपद पटकावले. पुरुष गटाच्या फुटबॉलमध्ये एमजीएम स्कूल ऑफ बायोमेडीकल सायन्सेस, औरंगाबाद, थ्रोबॉलमध्ये डॉ. जीवायपी कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, महिला कबड्डीत एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नालॉजी, बॅडमिंटन (महिला) एमजीएम मेडिकल कॉलेज, बॅडमिंटन (पुरुष) एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, टेबल टेनिस (पुरुष) एमजीएम मेडिकल कॉलेज या संघांनी बाजी मारली. तर लघूनाट्य स्पर्धेत एमजीएम कॉलेज ऑफ नर्सिंग एज्युकेशनने विजेतेपद पटकावले. देशभक्तीपर गीतांच्या स्पर्धेत एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटने तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या संघाने प्रथम पुरस्कार मिळवला. वादविवाद स्पर्धेत एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अँड ह्युमनिटीजने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी एमजीएमच्या विविध महाविद्यालयांनी सक्रीय पुढाकार घेतला होता.

एमजीएमध्ये इंडियन मॅथेमॅटीकल सोसायटीच्या ८७व्या वार्षिक परिषदेचे आयोजन
४ ते ७ डिसेंबरदरम्यान पार पडणार परिषद, जगभरातील तज्ञांचा सहभाग
एमजीएम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (जेएनईसी) अप्लाईड सायन्स विभागाच्या वतीने इंडियन मॅथेमॅटीकल सायन्सच्या (आयएमएस) ८७व्या आंतरराष्ट्रीय वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ४ ते ७ डिसेंबरदरम्यान ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या जागतिक परिषदेत जगभरातील तज्ञांचा सहभाग असेल.
दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आयएमएसचे अध्यक्ष प्रा.दिेपेंद्र प्रसाद, आयआयएससी बंगळुरूचे प्रा. ए.के.नंदकुमारन, महासचिव प्रा. सत्य देव, अकॅडमिक सेक्रेटरी प्रा. पियूश चंद्रा (आयआयटी मुंबई), एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन होईल. त्यानंतर आयआयटी मुंबईचे प्रा. दिपेंद्र प्रसाद यांचे ‘अरिथमेटीक इन एल-लॉज’, पॅरिसचे प्रा. मायकल वाल्ड्स्मिड्ट यांचे ‘मल्टीव्हेरिएट लिडस्टोन इंटरपोलेशन’, प्रा.सिद्धार्थ मिश्रा यांचे ‘डीप लर्निंग फॉर पीडिई’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ दिल्लीच्या प्रा. गीता व्यंकटरमन यांचे ‘वुमन इन मॅथेमॅटीक्स: अ लाँग रोड अहीड?’, सौराष्ट्र विद्यापीठ राजकोटचे प्रा. समीर के. वैद्य यांचे ‘ग्राफ एनर्जी:अॅन एमर्जिंग फ्रंटेरिअर बीटवीन मॅथेमॅटीक्स अँड केमिस्ट्री’, सर्बन विद्यापीठ, पॅरिसचे प्रा. मायकल वाल्ड्स्मिड्ट यांचे ‘मल्टीव्हेरिएट लिडस्टोन इंटरपोलेशन’ या विषयावर विचार मांडतील. दरम्यान, 15व्या गणेश प्रसाद मेमोरिअल अवार्ड लेक्चर अंतर्गत कोलकात्याच्या जादवपूर विद्यापीठाचे प्रा. कल्लोल पॉल ‘बर्कोफ जेम्स ऑर्थोगोनॅलिटी: इट्स रोल इन जिओमेट्री ऑफ बनॅक स्पेसेस’ या विषयावर व्याख्यान देतील. 85 व्या पी.एल.भटनागर मेमोरिअल अवार्ड लेक्चर अंतर्गत आयआयटी कानपूरचे डॉ. मालेय बॅनर्जी, 32व्या हंसराज गुप्ता मेमोरिअल अवार्ड लेक्चर अंतर्गत टीआयएफआरचे डॉ. टी.एन. व्यंकटरमण यांचे, 32व्या व्ही.रमनस्वामी अय्यर मेमोरीअल अवार्ड लेक्चरअंतर्गत आयएमएससीचे विजय कोडीयालम, 15 व्या गणेश प्रसाद मेमोरिअल अवार्ड लेक्चरअंतर्गत जादवपूर विद्यापीठाचे डॉ. कल्लोल पॉल यांचे व्याख्यान होईल. आयएमएस ही सर्वात जुनी आणि सर्वाधिक सदस्य असलेली सोसायटी असून जगभरात त्यांच्याकडून परिषदांचे आयोजन केले जाते. यंदा हा बहुमान एमजीएम विद्यापीठाला मिळाला आहे. या परिषदेत जगभरातील १२० जण शोधनिबंध सादर करणार आहेत. परिषदेत होणारी सर्व व्याख्याने एमजीएम विद्यापीठाच्या (www.mgmu.ac.in/ims) संकेतस्थळावरून सर्वांना पाहता येतील, असे परिषद आयोजन समिती सचिव डॉ.व्ही.एम.आरोळे आणि समन्वयक आयएमएस 2021 यांनी कळवले आहे.
AMASICON 2021 या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाट्न
AMASICON 2021 या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाट्न श्री कमलकिशोर कदम, कुलपती एम.जी.एम. आरोग्य विद्यापीठ व अध्यक्ष एम.जी.एम.संस्था यांच्या हस्ते पार पडले. AMASI चे वरिष्ठ उपअध्यक्ष डॉ. कल्पेश जानी हे अध्यक्ष स्थानी होते. डॉ. कल्पेश जानी यांनी आपल्या भाषणात एम.जी.एम.मध्ये असलेल्या अति उच्च दर्जा च्या सुविधांचे कौतुक केले. व तसेच AMASI च्या नवीन आंतरराष्ट्रीय एन्डोस्कोपी ट्रैनिंग साठी डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्याचे संकेत दिले.
श्री कमलकिशोर कदम सर म्हणाले मानवी शरीर सर्वात कॉम्प्लेक्स मशीन आहे व त्याचे ऑपरेशन करणे फार जिकरीचे व कौशल्य पूर्वक आहे व त्यामध्ये एम.जी.एम.ने पुढाकार घेऊन नुसता रूगनसेवेसाठी फायदा झाला नाही तर त्याचे ट्रैनिंग हे पदवीत्तर विध्यार्थी व प्रॅक्टिसिंग सर्जन यांना पण झाला. त्यामुळे लॅप्रोस्कॉपीक ह्या अति उच्च तंत्रज्ञान ग्रामीण भागातील तळागाळातील रुग्नापर्यंत पोहचण्यास मदत झाली. यापुढे सुद्धा शैक्षणिक कार्यक्रमासाठी एम.जी.एमचे नेहमी पुढाकार व सहकार्य असेल असे त्यांनी AMASI चे उपअध्यक्ष डॉक्टर कल्पेश जानी यांना अश्वासन दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी एम.जी.एमच्या “Centre of Excellence” इन लॅप्रोस्कोपी आणि एन्डोस्कोपी ची २००२ पासून झालेली सुरुवात वर आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेतला व तसेच या सेंटरने राष्ट्रीय पातळीवर लॅपरोस्कोपी या तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार व्हावा या दृष्टीने होणाऱ्या कामाची माहिती दिली व एम.जी.एम मॅनॅजमेन्ट ने उपलब्ध केलेल्या तंत्रज्ञान व इतर सोयीसुविधा मुळेच हे सर्व आम्ही करू शकलो हे नमूद केले.
हि जागतिक परिषद AMASI ने एम.जी.एमवर विश्वास ठेऊन एम.जी.एम मध्ये करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी AMASI चे आभार मानले.
आज या परिषदेमध्ये ऐकून ६ लॅपरोस्कोपिक व १ एंडोस्कोपिक शस्त्रक्रियाचे प्रात्यक्षिक झाले. यामध्ये डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी एंडोस्कोपिक पोएम हि शस्त्रक्रिया AMASI च्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच लाईव्ह करून दाखविली त्याबद्दल त्यांचे
जगभरातील 9000 डॉक्टरांना एमजीएममधून दाखवले जाणारे लॅप्रोस्कोपीच्या क्लिष्ट शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक
AMASICON 2021 ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपीक वर्कशॉपमध्ये 26 व 27 नोव्हेंबर रोजी सादरीकरण
औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयतून जगभरातील सुमारे 9000 शल्यविशारदांसमोर लॅप्रोस्कोपीच्या क्लिष्ट शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.
असोशिएशन ऑफ मिनिमल ॲक्सेस सर्जन ऑफ इंडियाद्वारा (अमासी) आयोजित 16व्या वार्षिक परिषदेत दि. 26 ते 28 नोव्हेंबरदरम्यान हे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती एमजीएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अमासिकॉन ही भारतातील सर्जन्सची मोठी संघटना असून त्याचे 8000 सदस्य आहेत. लेप्रॉस्कोपिक तंत्रज्ञानाच्या प्रसार आणि प्रचारासाठी तसेच नव्या सर्जनला प्रशिक्षित करण्यासाठी 2002 मध्ये कोईम्ब्तूर येथील जगप्रसिदध् लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. सी. पलानीवेलू यांनी या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने आजवर देशविदेशात 15 आंतरराष्ट्रीय परिषदांचे (अमासीकॉन) आयोजन केले आहे. दि. 26 ते 28 नोव्हेंबर 2021 दरम्यान 16 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करण्यात आले असून या परिषदेत सुमारे 1000 सर्जन दिल्ली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत तर 8000 पेक्षा जास्त सर्जन जगभरातून ऑनलाईन पध्दतीने उपस्थित असतील. या परिषदेत व्याख्याने, चर्चासत्र, कार्यशाळा तसेच प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहेत. अमासीच्या वार्षिक परिषदेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे प्रात्यक्षिके. ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी जगभरातील सर्जन्स उत्सुक असतात. दि. 26 व 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 03.00 या वेळेत या लॅप्रोस्केापिच्या अतिशय गुंतागुंतीचे व क्लिष्ट ऑपरेशन होणार आहेत. ही सर्व प्रात्यक्षिके भारतातून करण्यासाठी डॉ. सी. पलानीवेलू यांचे कोईम्ब्तूरचे सेंटर आणि औरंगाबाद येथील एमजीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची निवड करण्यात आलेली आहे. एमजीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथून लिव्हर पॅनक्रियाज व गॉल ब्लॅडरच्या अतिशय गुंतागुंतीच्या व क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या ऑपरेशनचे प्रात्यक्षिक होणार आहे. दोन दिवसात सुमारे 15 ते 20 शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक करण्यात येईल. ही प्रात्यक्षिके एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रविण सुर्यवंशी, बडोदा येथील डॉ. कल्पेश जानी, मुंबई येथील डॉ. रॉय पाटणकर व डॉ. समीर रेगे, तसेच वापी येथील डॉ. श्रीवास्तव करणार आहेत. अमासीच्या इतिहासात पहिल्यांदाच इंन्डोस्कोपिक सर्जरीची प्रात्यक्षिके एमजीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, औरंगाबाद येथून होणार आहेत. डॉ. प्रवीण सूर्यवंशी हे लॅप्रोस्कोपी व इन्डोस्कोपीद्वारे अत्याधुनिक शस्त्रक्रिया करणाऱ्या भारतीय नामवंत तज्ञांपैकी एक आहेत. त्यांच्या पुढाकाराने भारतातील सर्व सर्जन्सला ॲडव्हान्स ट्रेनिंग देण्याच्या उद्देशाने अमासीकॉन परिषदेत पहिल्यांदाच इंन्डोस्कोपीची प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत. डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी एमजीएम हॉस्पिटलमध्ये 2002 साली ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी व इन्डोस्कोपी या सेंटरची स्थापना केली. गरीब रुग्णांना या अत्याधुनिक सुविधेचा अत्यंत कमी खर्चात लाभ मिळावा तसेच पदव्यूत्तर पदवीच्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे, हा या केंद्राच्या निर्मितीमागील उद्देश आहे. या केंद्रात आजवर 3 राष्ट्रीय, 7 राज्यस्तरी तसेच 50 हून अधिक सीएमईचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांचे लॅप्रोस्कोपी व इन्डोस्कोपीमध्ये 25 हून अधिक संशोधन पेपर प्रकाशित झालेले असून अनेक आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय परिषदांमध्ये 50 हून अधिक गुंतागुंतीच्या व जटील शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले आहे. याचाच एक भाग म्हणून KARL STORZ, Germany कंपनीने एमजीएमच्या अति उच्चदर्जाच्या सुविधा गरिबांपर्यंत पोहचवण्याच्या प्रयत्नांची दखल घेऊन Centre of Gastroenterology आणि Minimal Access Surgery ला “Centre of Excellence” चा दर्जा बहाल केला आहे. लॅप्रोस्कोपीच्या अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रियांच्या प्रात्यक्षिकाच्या सादरीकरणाचा हा जागतिक बहुमान मिळवत एमजीएम रुग्णालयाने एक नवा किर्तिमान स्थापित केला आहे.

डॉ.प्रवीण सूर्यवंशी यांची असोशिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया कार्यकारिणीवर निवड
असोशिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया या भारतातील सर्व सर्जनच्या मूख्य संघटनेच्या कार्यकारी समितीवर (Executive Committee) एम.जी.एम. चे उपअधिष्ठाता तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.) डॉ. प्रविण सुर्यवंशी यांची सलग दुसऱ्यांदा निवड झालेली आहे. या संघटनेच्या कार्यकारी समितीवर मराठवाड्यातून निवडून जाणारे ते पहिलेच शल्यविशारद (Surgeon) आहेत. सन 2018 साली पहिल्यांदा ते या समितीवर देशातून सर्वाधिक मताने निवडून आले होते. मागील 3 वर्षात त्यांनी नॅशनल क्वालिटी एन्हांसमेंट या असोशियशनच्या प्रोग्रामद्वारे त्यांनी देशभरातील स्मॉल हेल्थ केअर सर्व्हीस ऑर्गनायझेशनची क्वालिटी सुधारण्यासाठी भरीव असे कार्य केले. त्यांनी स्मॉल स्केल हेल्थ केअर ऑर्गनाझेशनला एन्ट्रीलेव्हल NABH मानांकन प्राप्त करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंटेशन व प्रोसेस इत्यादींची माहिती पुरविली व त्यासाठी देशभर सेमिनार आयोजित केले. असोशिएशन ऑफ सर्जन्स ऑफ
इंडियाच्या नॅशनल क्वालिटी एन्हांसमेंट प्रोगामचे त्यांनी डायरेक्टर म्हणून काम पाहिले. त्यांच्या या कामाची पावती म्हणून ते सलग दुसऱ्यांदा या अति महत्वाच्या असोशिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया संघटनेवर निवडून आलेले आहेत.
एम.जी.एम. चे उपाध्यक्ष श्री. डॉ. पी. एम. जाधव, सचिव श्री. अंकुशरावजी कदम, व अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा तसेच औरंगाबाद सर्जीकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. निखील चव्हाण व डॉ. नारायण सानप यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

उत्तम आयुष्यासाठी मानसिक आरोग्य जपणे महत्वाचे
एमजीएमच्या कार्यक्रमात डॉ. विक्रांत पाटणकर यांचे मत
आज स्पर्धेच्या युगात आपल्यापुढे खूप आव्हाने आहेत. या आव्हानांमुळे आपल्यावर खूप मानसिक दडपण यायला लागले आहेत. या दडपणातून बाहेर निघण्यासाठी आणि उत्तम आयुष्यासाठी मानसिक आरोग्य जपणे फार महत्वाचे आहे, अशी मत प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. विक्रांत पाटणकर यांनी व्यक्त केले. ते एमजीएम विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी एमजीएम विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, समुपदेशन विभागप्रमुख डॉ. सुरेखा मराठे, मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. वैशाली चौधरी, प्रा.आर्या तेंडुलकर आदींची उपस्थिती होती.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने एमजीएमच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीने दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामध्ये मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीसाठी मानसशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. तर, दुसऱ्या दिवशी डॉ. विक्रांत पाटणकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी मानसिक आरोग्याविषयी विविध दाखले देत मांडणी केली आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचीही उत्तरे दिली. मानसिक आरोग्य हे उत्तम आयुष्याची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थी दशेतच आपल्या समस्यांप्रती जागरुकता ही उत्तम लक्षणे असून आजचे युवक जागरुक आहेत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. साक्षी डोंगरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर दिया फुलवाणी यांनी आभार प्रदर्शन केले.
जेएनईसीचे मेकॅनिकल विभागाला टाटाच्या रेडी इंजिनिअर प्रोग्राममध्ये प्रथम क्रमांक
टाटा टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या यावर्षीच्या रेडी इंजिनिअर प्रोग्राममध्ये एमजीएम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (जेएनईसी) मेकॅनिकल विभागाने औरंगाबाद क्लस्टरमधून प्रथम क्रमांक पटकावले आहे.
रेडी इंजिनिअर प्रोग्राम ही टाटा टेक्नालॉजीची सीएसआर अॅक्टिव्हीटी आहे. यासाठी जेएनईसी मेकॅनिकल डिपार्टमेंट 2018-19 पासून संलग्नित आहे. सर्वोत्तम मेकॅनिकल कॉलेजची यादी ठरवण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीने रेडी इंजिनिअर प्रोग्राम 2020-21 चे आयोजन केले होते. यात एमजीएम जेएनईसीच्या मेकॅनिकल विभागाने सहभाग नोंदवला होता. त्यानुसार टाटा टेक्नॉलांजीचे निरीक्षकांनी एमजीएम जेएनईसीच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या इन्व्होवेशन इन्कूबेशन रिसर्च सेंटरला भेट दिली होती. टाटा टेक्नॉलॉजीकडून पर्यवेक्षक म्हणून आलेल्या सिद्धार्थ यावलकर, अजीत हब्बू यांनी आपल्या डिपार्टमेंटचे काम आणि अत्याधुनिक सुविधा अतिशय उच्च दर्जाच्या असल्याचे म्हटले होते.
यावेळी एमजीएम जेएनईसी मेकॅनिकल डिपार्टमेंटचे विभागप्रमुख डॉ.एम.एस.कदम, रेडी इंजिनिअर प्रोग्रामचे चीफ कॉर्डीनेटर व सहयोगी प्राध्यापक डॉ. अरविंद एल. चेल, इन्व्होवेशन इन्कूबेशन रिसर्च सेंटरचे प्रमुख डॉ. नितीन फापट, प्रा. डी.एस.खेडेकर, प्रा. एस.एल.थेंगडे, प्रा.एम.एन.बारगीर, आकाश बारोटे, प्रशांत मुरमुडे आदींची उपस्थिती होती. या यशाचे एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, प्राचार्य डॉ. हरिरंग शिंदे, उपप्राचार्य डॉ.विजया मुसांडे यांनी अभिनंदन केले आहे. याबाबत कुलगुरू डॉ. विलास सपकाळ म्हणाले की, आपण टाटा टेक्नॉलॉजीशी केलेल्या एमओयूच्या प्रयत्नांना यश आहे. काळानुरूप इंडस्ट्रीशी सुसंगत कार्य होत राहिले पाहिजे. यातून उत्तम मनुष्यबळाची निर्मिती होत राहते, असे कुलपती अंकुशराव कदम म्हणाले.

*आजच्या अनेक समस्या विकासाची अपत्ये, काळाला गांधी मूल्यांची गरज*
*एमजीएममध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात जागतिक तज्ज्ञांची भावना*
आज आपण भलेही विकासाच्या गोष्टी करत असलो तरी कोरोना, चक्रीवादळ आणि अन्य अनेक समस्या या याच विकासाची अपत्ये आहेत. या समस्यांतुन मार्ग काढण्यासाठी गांधी विचारांची आणि मूल्यांची गरज आहे, अशी भावना गांधी विचारांचे अभ्यासक डॉ. ख्रिस्तियन बार्टोल्फ आणि डॉ.सुरेश खैरनार यांनी व्यक्त केली. एमजीएममध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी महात्मा गांधी मिशनचे उपाध्यक्ष डॉ. पी.एम.जाधव, विश्वस्त प्रतापराव बोराडे, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, एमजीएम गांधीयन स्टडीज विभागप्रमुख प्रा.डॉ. जॉन चेलादुराई तसेच पदाधिकारी, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
‘गांधी आणि विकास प्रतिमान‘ या विषयावर बोलताना शांतता कार्यकर्ता तसेच राष्ट्रीय सेवा दलाचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार म्हणाले, कधी एकेकाळी एक हाडामांसाचा माणूस होता ज्याने जगाला शांतीचा संदेश दिला, या गोष्टीवर आगामी काळातील लोकांना विश्वास बसणार नाही. जगभरात एक लाखांच्या वर पुस्तके लिहिल्या गेलेला आणि बायबलनंतर ज्याच्यावरील सर्वाधिक प्रकाशने विकल्या गेली तो माणूस म्हणजे महात्मा गांधी आहे. जगभरातील सुमारे 125 विद्यापीठांमध्ये गांधी शिकवले जातात. सध्या लोकांकडे पैसा आहे पण कौटुंबिक संकल्पना उद्धवस्त होऊ लागली आहे. गांधींच्या विचारात माणूस आणि कुटुंब महत्वाचे होते. विकासाच्या अवधारनेचा प्रश्न आज मोठा आहे. एकीकडे औद्योगिकीकरण, तंत्रज्ञान आले पण तणाव किंवा मानसिक अवस्था स्थिर ठेवण्यासाठी ते कामाला येणार नाही. कर्मकांडात भारतीय खूप चतुर आहे आणि त्यांनी अनेकांना देव बनवून ठेवले आहे. पण गांधीला देव बनवू नये, असे मला वाटते. कोरोना आणि तत्सम समस्या हे आपल्या विकासाचे अपत्य आहेत. इतकं भयानक होत असताना आपण अंतर्मुख होण्याची गरज आहे. गांधी हा केवळ पुतळे उभे करून, खादी घालून जिवंत राहणार नाहीत तर त्यांना विचारातून, कृतीतून जिवंत ठेवावे लागेल, असेही खैरनार म्हणाले. तर ‘गांधी आणि एकविसावे शतक‘ या विषयावर बोलताना जर्मनीच्या बर्लिनमधील गांधी माहिती केंद्राचे अध्यक्ष डॉ. ख्रिस्तियन बार्टोल्फ म्हणाले, अहिंसा हे एक नैतिक अधिष्ठान आहे आणि गांधींच्या मानवी मूल्यांच्या प्रसारामुळे जागतिक अहिंसा दिन साजरा केला जातो, हे गौरवास्पद आहे. मी गांधींचे आत्मचरित्र वाचले तेव्हा एका गोष्टीने अधिक प्रभावित झालो की, गांधींनी त्यांच्या आयुष्यातील चुकांची तिथे गांभीर्याने नोंद केली आहे.त्यामुळेच मला हे जगातील सर्वोत्तम ग्रंथ वाटते. गांधी हे मला वास्तवाशी नाळ जुळलेले नेते म्हणून जास्त भावतात, अशी भावनाही बार्टोल्फ यांनी व्यक्त केली. ‘गॉड ब्लेस द ग्रास‘ ही कविताही बार्टोल्फ यांनी या वेळी सादर केली. दरम्यान, गांधी शिक्षण ही काळाची गरज आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असलो तरी त्याला नैतिकतेचे अधिष्ठान असावे. त्यात पायाभूतता आणि मौलीकता आवश्यक आहे, याच अनुषंगाने सर्व विद्यार्थी घडावे, या अपेक्षेने एमजीएममध्ये गांधी अभ्यास विभागाची रचना करण्यात आल्याची भूमिका जॉन चेलदुराई यांनी मांडली. प्रा.आशा देशपांडे आणि प्रा.कुणाल लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले.
*खादी प्रचलन, नाट्य, तंत्रज्ञान प्रदर्शनाने वेधले लक्ष*
गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर एमजीएममध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खादीपासून निर्मित विविध प्रकारचे, शैलीचे आणि रंगाचे वस्त्र ‘खादी प्रचलन’ कार्यक्रमाद्वारे सादर करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी खादी वस्त्र परिधान करण्याची शपथ घेतली. गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते चरखा प्रदर्शन, नवसंकल्पना आणि योग्य तंत्रज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर डिस्प्लेचे उद्घाटन करण्यात आले. गांधीजींनी सांगितलेल्या सात सामाजिक पातकांवर एमजीएम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रचलेल्या पथनाट्याचे सादरीकरणही या वेळी करण्यात आले.
*एमजीएममध्ये आता आठवड्यातून एक दिवस खादी वस्त्र*
गांधी आपल्याला आयुष्यात आणायचा असेल तर खादी आणि प्रार्थना महत्वाची आहे. या अनुषंगाने एमजीएम विद्यापीठात दर शनिवारी सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी खादीचेच वस्त्र परिधान करतील, अशी घोषणा एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी केली.
MGM organizes various programs on the occasion of Mahatma Gandhi Jayanti
To mark the 152nd birth anniversary of Mahatma Gandhi, MGM has been organized various programs. The cleanliness drive will be held on October 2 at 7 a.m. in the Seven Hills to Central Naka area. After that, the main function of Gandhi Jayanti will be held at MGM’s Rukmini Hall from 8 am. It will be followed by prayers, followed by khadi practice (presentation of khadi garments). At 10 am, a peace activist and former president of the National Service Force, Dr. Suresh Khairnar will give a lecture. After that, the President of the Gandhi Information Center in Berlin, Germany, Dr. Christian Bartolf will guide on the subject of ‘Gandhi and the 21st Century. Secretary of Mahatma Gandhi Mission and Chancellor of MGM University Ankushrao Kadam, Vice Chairman Dr. P. M. Jadhav, Trustee Prataprao Borade, Vice-Chancellor of MGM University Dr. Vilas Sapkal will present. A blood donation camp has also been organized on the occasion of Gandhi Jayanti. Meanwhile, dignitaries will inaugurate the Charkha Exhibition, Innovation, and Appropriate Technology Exhibition and Poster Display. A skit composed by the students of MGM University on the seven social sins by Gandhiji will also be presented at this time. Registrar Dr.Ashish Gadekar and HOD of Gandhian Studies department Dr. John Cheladurai appealed to participate in this program.
एमजीएममध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
महात्मा गांधी यांच्या 152व्या जयंतीनिमित्त एमजीएममध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता सेव्हन हिल्स ते सेंट्रल नाका परिसरात श्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी 8 वाजेपासून एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात गांधी जयंतीचा मुख्य समारोह पार पडेल. यात सुरुवातीला प्रार्थना, त्यानंतर खादी प्रचलन (खादीपासून निर्मित वस्त्रांचे सादरीकरण) होईल. सकाळी 10 वाजता ‘गांधी आणि विकास प्रतिमान’ या विषयावर शांतता कार्यकर्ता तसेच राष्ट्रीय सेवा दलाचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर ‘गांधी आणि एकविसावे शतक’ या विषयावर जर्मनीच्या बर्लिनमधील गांधी माहिती केंद्राचे अध्यक्ष डॉ. ख्रिस्तियन बार्टोल्फ यांचे व्याख्यान होईल. या वेळी महात्मा गांधी मिशन संस्थेचे सचिव आणि एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, उपाध्यक्ष डॉ. पी.एम.जाधव, विश्वस्त प्रतापराव बोराडे, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती राहील. गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते चरखा प्रदर्शन, नवसंकल्पना आणि योग्य तंत्रज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर डिस्प्लेचे उद्घाटन करण्यात येईल. गांधीजींनी सांगितलेल्या सात सामाजिक पातकांवर एमजीएम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रचलेल्या पथनाट्याचे सादरीकरणही या वेळी केले जाईल. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर आणि कार्यक्रमाचे संयोजक तसेच एमजीएम गांधीयन स्टडीज विभागप्रमुख प्रा.डॉ. जॉन चेलादुराई यांनी केले आहे.
MGM University organizes a Video Documentary Competition
The Department of Gandhian Studies of MGM University has organized a video documentary competition based on the values of Mahatma Gandhi. For this Rs.5000 (first prize), Rs.3000 (second prize), Rs. 2000 (Third Prize) Cash, Trophy, and Certificate will be given as a prize. The last day to send a video documentary is October 10. The main themes for the competition are truth, non-violence, sustainability, inclusiveness based on the values adhered to by Gandhiji. The last day to register for the competition is September 30 and the last day to submit a documentary will be October 10. Results and awards will be distributed on October 15. Only students can participate in this competition and there are no fees for it. The duration of the documentary should not exceed 3 minutes. The ready documentary should be sent to [email protected]. For more information, contact MGM Gandhian Studies Department Head Dr. John Chelladurai on 9422776936.

एमजीएम विद्यापीठाच्या वतीने व्हिडिओ डॉक्युमेंटरी स्पर्धेचे आयोजन
एमजीएम विद्यापीठाच्या गांधीयन स्टडीज विभागाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या मुल्यांवर आधारित व्हिडिओ डॉक्युमेंटरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी रु.5000 (प्रथम पुरस्कार), रु.3000 (द्वितिय पुरस्कार), रु. 2000 (तृतीय पुरस्कार) रोख, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र, हे पुरस्काराच्या रुपात दिले जाईल. व्हिडिओ डॉक्युमेंटरी पाठवण्याचा शेवटचा दिवस 10 ऑक्टोबर 2021 आहे. यात कोणत्याही अभ्यासक्रमाचे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. स्पर्धेसाठी गांधीजींनी पालन केलेल्या मुल्यांवर आधारित सत्य, अहिंसा, शाश्वतता, सर्वसमावेशकता हे प्रमुख विषय निश्चित करण्यात आले आहेत.
स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस 30 सप्टेंबर असून डॉक्युमेंटरी जमा करण्याचा शेवटचा दिवस 10 ऑक्टोबर 2021 राहील. निकाल आणि पुरस्कार वितरण 15 ऑक्टोबर रोजी करण्यात येईल. या स्पर्धेत फक्त विद्यार्थ्यांनाच सहभागी होता येईल आणि त्यासाठी कोणतेही शुल्क नाहीत. डॉक्युमेंटरीचा कालावधी 3 मिनिटांपेक्षा अधिक असू नये. तयार डॉक्युमेंटरी c[email protected] या ईमेल आयडीवर पाठवावी. अधिक माहितीसाठी एमजीएम गांधीयन स्टडीज विभाग प्रमुख डॉ. जॉन चेल्लादुराई यांच्याशी 9422776936 या क्रमांकावर संपर्क साधावा.

एमजीएममध्ये ‘विकी लव्हज् मोनुमेंटस’वर कार्यशाळा संपन्न
जागतिक स्तरावर होणाऱ्या स्मारकांच्या फोटोग्राफी स्पर्धेची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी एमजीएम विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयाच्या वतीने ‘विकी लव्हज् मोनुमेंटस’ या विषयावर शुक्रवारी एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्मारकांची माहिती व्हावी यासाठी विकी मीडियाच्या वतीने ही फोटोग्राफी स्पर्धा घेतली जात असून आजच्या या कार्यशाळेत विकिमिडीया फाउंडेशनच्या इंटरनेट अँड सोसायटी ऍक्सेस फॉर नॉलेज प्रोग्रॅमचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी सुबोध कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
आजपर्यंत विकी मीडियावर १.७ दशलक्ष फोटो अपलोड झाले आहेत. विकी मीडियावर अपलोड करण्यात आलेली माहिती विश्वसनीयता आणि पडताळणी या दोन विभागात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना विकी मीडियावर फोटो अपलोड करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. प्रात्यक्षिकाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांकडून फोटो अपलोड करून घेतले. स्पर्धेत भाग घेण्यासाठी फोटो अपलोड करण्याची तारीख ३० सप्टेंबर २०२१ असून आपल्या आजूबाजूच्या परिसरातील, शहरातील, जिल्ह्यातील अथवा अन्य कोणत्याही ठिकाणी काढलेले जुन्या वास्तूंचे/स्मारकांचे फोटो अपलोड करायचे आहेत असेही त्यांनी सांगितले. यावेळी सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिव्या कांबळे यांनी केले.
जगात शांततेचे काम कठिण पण अत्यावश्यक
जागतिक शांतता दिनाच्या परिसंवादात तज्ञांचा सूर
जगात सध्याच्या काळात गरिबी, बेरोजगारी, मानवाधिकारासारख्या असंख्य समस्या आहेत. त्यातच अराजकता, सीमावाद, धर्मवादासारख्या गोष्टीही वेगळे वळण घेऊ लागलेल्या आहेत. अशा सर्व समस्यांवर मार्ग निघणे खूप गरजेचे आहे. युद्ध करणे सोपे असते पण शांततेचे कार्य कठिण असून जगाला त्याची गरज आहे, असा सूर जागतिक शांतता दिनानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये देश-विदेशातील तज्ञांनी व्यक्त केला.
एमजीएम विद्यापीठाचे गांधीयन स्टडीज विभाग आणि सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाण वर्धा आणि केरळ केंद्रीय विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक शांतता दिनाच्या निमित्ताने ‘अफगाणिस्तान आणि जागतिक शांतता’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. यात ज्येष्ठ गांधी अभ्यासक आणि एमजीएम विद्यापीठज्ञतील एमिनंट प्रोफेसर डॉ. मार्क लिंडले, केरळ केंद्रीय विद्यापीठाच्या गांधीयन स्टडीज विभागाचे प्रा.डॉ. मुलाकट्टू जॉन, एमजीएम गांधीयन स्टडीज विभागाचे प्रा.डॉ. जॉन चेल्लादुराई तसेच कर्नाटकातील शिक्षण, पर्यावरण आणि समाज विभागाचे कार्यकारी संचालक डॉ. बी.के.हरीश कुमार यांचा सहभाग होता. तर एमजीएम विद्यापीठातील सामाजिक शास्त्र विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांच्यासह देशविदेशातील तज्ञ आणि अभ्यासकांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात डॉ. जॉन चेल्लदुराई म्हणाले, जगाला गांधीजीचे वास्तववादी चिरंतन शांततेचे मर्म अद्याप कळालेले नाही. सर्वोदय, सर्वेशी अर्थकारणाची बापूंची संकल्पना होती. पण, गरीबी, बेरोजगारीचे वाढते प्रमाण संघर्ष निर्माण करत आहे. गांधी विचार, शांततावादी मार्ग अनेक समस्यांमधून मार्ग काढू शकते. त्यासाठी आपण सदैव प्रयत्नरत असायला हवे.
‘प्रॉस्पेक्ट ऑफ पीस- इन कन्टेक्स्ट ऑफ तालिबान-अफगाणिस्तान’ या विषयावर प्रा.डॉ. मुलाकट्टू जॉन म्हणाले, शांततेसाठी काम करणे कठिण आहे. युद्ध हे खूप सोपे आहे. जेव्हा स्वत:वर अन्याय झाला असे लोकांना वाटू लागते, तेव्हा हिंसेचा मार्ग धरला जातो. पहिल्या तालिबान कार्यकाळापेक्षा सध्याचे अफगाणिस्तान बरेच आधुनिक आहे. महत्वकांक्षी युवकांची संख्या येथे मोठी आहे. सर्वसमावेशक सरकार स्थापन करू, असे तालिबानी सातत्याने सांगत असले तरी त्यात मोठा विरोधाभास आहे. तेथील जनताच संभ्रमावस्थेत आहे. अफगानातील ग्रामीण जनता शहरीपेक्षा मोठ्या प्रमाणात धर्मवादी आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा तालिबान्यांचा सदैव प्रयत्न राहीला आहे. आता स्थानिक संस्कृतीचा विचार करून तेथील संघर्ष दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगानातील संसाधनाच्या उपयोगाबाबत पुढाकार घ्यावा, अशी भावनाही डॉ. जॉन यांनी व्यक्त केली.
‘अफगान वार अँड एपिसोड इन द कल्चरल हिस्टरी ऑफ यूएसए-इन द कॉन्टेक्स्ट ऑफ पीस’ या विषयाच्या अनुषंगाने प्रा.डॉ. मार्क लिंडले म्हणाले, व्हिएतनाम युद्धापूर्वी अमेरिका हे जगाच्या पाठीवर अत्यंत समृद्ध राष्ट्र होते. जपान युद्धानंतर अमेरिका सांस्कृतिक तणावात होते आणि त्यानंतर संपूर्ण समृद्धतेवर निरंकुशता आली. अफगाणिस्तानच्या स्थितीमुळे जगासमोर मानवाधिकाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी शांतता हाच महत्वाचा पर्याय आहे, अशी भावनाही मार्क लिंडले यांनी व्यक्त केली. या वेळी सहभागींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना तज्ञांनी शांततेचा सल्ला दिला. सिबी जोसेफ यांनी सुत्रसंचलन केले.
राज्यसरकारने मराठवाड्याच्या विकासासाठी निधी पुरवणे हे संविधानात्मक दायित्व -प्रा.एच.एम.देसरडा
मराठवाड्यातील जनतेने दोन स्वातंत्र्य लढाया अनुभवल्या असून विनाअट महाराष्ट्रात सामिल झालेल्या या विभागाच्या विकासासाठी राज्य सरकारने निधी पुरवणे हे संविधानात्मक दायित्व असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी केले.
एमजीएम विद्यापीठाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘वर्तमान आणि भविष्यातील प्रश्न आणि एकंदर मराठवाडा मुक्तीसंग्राम’ हा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता. या वेळी एमजीएम संस्थेचे विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, परीक्षा नियंत्रक कर्नल प्रदीप कुमार, डॉ. प्राप्ती देशमुख, विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थिती होते.
प्रा. देसरडा पुढे म्हणाले की, मराठवाडा हा एक संसाधन संपन्न प्रदेश आहे. येथे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधने आहेत. जमीन, पाणी, पर्जन्यमान, कष्टकरी शेतमजूर आणि एक मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेली जनता आहे. त्यांनी एक नव्हे तर दोन स्वातंत्र्य लढाया अनुभवल्या आहेत. त्यांची ऊर्जा जाणीवपूर्वक या प्रदेशाच्या विकासासाठी वापरण्याचा संकल्प करणे हा आजच्या मुक्तिसंग्राम दिनाचा संदेश असल्याचे त्यांनी सांगितले. आज मितीला मराठवाडा हा सव्वादोन कोटी लोकसंख्या असलेला प्रदेश आहे. 65 लाख भौगोलिक क्षेत्र आहे. जे महाराष्ट्राच्या अनुक्रमे 16 व 21 टक्के आहे. त्या प्रमाणात राज्यसरकारने इथल्या विकासासाठी निधी पुरवणे हे संविधानात्मक दायित्व असल्याचेही देसरडा म्हणाले.
हवामान बदल ही आज जगासमोरील महत्वाची समस्या आहे. त्याच्या निराकरणासाठी विकास प्रणाली व जीवनशैलीत बदल करणे यासाठी गरजेचे आहे. भारत, महाराष्ट्र व मराठवाडा यात महत्वाची भूमिका बजावू शकतो. आजच्या घडीला मराठवाड्यात असलेली पाच विद्यापीठे, हजाराहून अधिक महाविद्यालये आणि दहा हजार शाळांनी यासाठी हिरीरीने काम केले पाहिजे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रारंभी प्राचार्य प्रताप बोराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. डॉ. विशाखा गारखेडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
महात्मा गांधी मराठवाडा भूषण
वैद्यक, अभियांत्रिकी, कृषी, पत्रकारिता, कला, सामाजिक शास्त्रे असा ज्ञानशाखांचा विशाल विस्तार असणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य महात्मा गांधी या संस्थेविषयी आपणास माहिती आहेच. या संस्थेने आता मराठवाड्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात काही उपक्रम सुरु करण्याचे ठरविले आहे. त्याचा एक भाग म्हणून सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या मूळच्या मराठवाड्याच्या असणाऱ्या दोघांना या वर्षीपासून दरवर्षी महात्मा गांधी मराठवाडा भूषण हा सन्मान देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या सन्मानात ५० हजार रुपयांची राशी आणि सन्मानचिन्हाचा समावेश आहे.
सन्मानार्थीची निवड करण्यासाठी जवाहरलाल नेहरु अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, सेवानिवृत्त न्यायाधीश डी. आर. शेळके, लेखक विचारवंत जयदेव डोळे, प्राध्यापक डॉ. क्षमा खोब्रागडे, कविवर्य दासू वैद्य, महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलसचिव आशिष गाडेकर आणि ज्येष्ठ संपादक लेखक प्रवीण बर्दापूरकर अशा नामवंतांचा समावेश आहे. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाच्या प्राचार्य डॉ. रेखा शेळके या सन्मान निवड समितीच्या संयोजक आहेत. या निवड समितीने २०२१ या वर्षीचे सन्मान प्रख्यात चित्रकार श्री. मुरली लाहोटी आणि कृषी व जलक्षेत्रात मोलाची भूमिका बजावणारे श्री.विजय अण्णा बोराडे यांची एकमताने निवड केली आहे.
मुळचे परळी येथील मुरली लाहोटी यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात घेतलेली उत्तुंग भरारी विस्मयचकीत करणारी आहे. अमूर्त शैलीच्या चित्रकलेच्या दालनात काम करत असतानाच त्यांनी चित्रांसाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करुन त्यांचे वेगळेपण सिद्ध केलेले आहे. सर्वाधिक चित्रप्रदर्शने होणारे श्री. मुरली लाहोटी हे कदाचित एकमेव समकालीन चित्रकार असावेत. त्यांची चित्रे केवळ महाराष्ट व भारतातच नाहीतर आंतरराष्ट्रीय पातळीवर ठिकठिकाणी प्रदर्शित झालेली आहेत.
मराठवाड्याच्या कृषी आणि जलक्षेत्रात श्री . विजयअण्णा बोराडे यांचे काम अत्यंत मूलभूत अशा स्वरुपाचे आहे. व्यवस्थापन, जलसंवर्धन, विनियोग अशा विविध पातळ्यांवर श्री.विजयअण्णा बोराडे यांनी बजावलेली कामगिरी बघून आपण नतमस्तक होतो. याशिवाय मुलींच्या शिक्षणाच्या क्षेत्रातही श्री. विजयअण्णा बोराडे यांनी केलेले काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. या सर्वच क्षेत्रात विजयअण्णा बोराडे यांचे कर्तृत्व केवळ मराठवाड्यापुरते मर्यादित नसून त्या कामाची आभा राज्यभर पसरलेली आहे.
श्री. विजयअण्णा बोराडे आणि श्री. मुरली लाहोटी यांना पहिला महात्मा गांधी भूषण सन्मान प्रदान करण्याचा निर्णय निवड समितीने एकमताने घेतला आहे. हा सन्मान प्रदान समारंभ लवकरच महात्मा गांधी मिशनच्या रक्मिणी सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाचे तपशील नंतर जाहीर करण्यात येतील.
प्राचार्य प्रताप बोरोडे
अध्यक्ष
प्राचार्या डॉ . रेखा शेळके
संयोजक
महात्मा गांधी मराठवाडा भूषण निवड समिती
एमजीएम मदर तेरेसा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली रुग्णसेवेची शपथ
एमजीएम मदर तेरेसा परिचर्या महाविद्यालयात नव्या सत्रातील विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी.एम.जाधव, विश्वस्त प्रतापराव बोराडे, कुलगुरु डॉ. विलास सपकाळ एमजीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र बोहरा व कुलसचिव आशिष गाडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला..
फ्लोरेंस नाईटिंगल यांनी किमीया युद्धात (१८५३-१८५६) जखमी झालेल्या सैनिकांना सांभाळताना हाती घेतलेले व्रत परिचर्या व्यवसायामध्ये सेवेचे प्रतीक म्हणून मानले जाते. याच पार्श्वभूमीवर परिचर्या सेवेतील विद्यार्थी या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ही शपथ घेत असतात. दरम्यान, उपस्थितांनी रुग्णसेवा आणि परिचर्या कार्याचे कौतूक करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. अनुराधा मस्के, व्यवस्थापकीय संचालिका प्रेरणा दळवी, प्राचार्य डॉ. सतीशचंद्र बुईटे, उपप्राचार्य डॉ. विश्वनाथ बिरादार, सर्व शिक्षक वर्ग, सहाय्यक कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.
MGM’s contribution to the implementation of the National Education Policy is huge
Higher and Technical Education Minister Uday Samant at MGM University’s Anniversary
The whole campus of MGM is great but the students who have learned from here are even better. MGM has been providing quality and innovative education for many years before the advent of the new National Education Policy (NEP). Therefore, the role of MGM in the implementation of NEP is important and the work of this university is ideal for others, said the Minister of Higher and Education Uday Samant. He was speaking as the chief guest at MGM University’s second-anniversary event.
At this time, MGM Chairman Kamalkishor Kadam, Vice Chairman Dr. PM Jadhav, Chancellor Ankushrao Kadam, Trustee Prataprao Borade, Vice-Chancellor Dr. Vilas Sapkal, Registrar Dr. Ashish Gadekar was present on the stage. MLA Ambadas Danve, Satish Chavan, Atul Save, and other leaders, office bearers, trustees, and professors were also present on the occasion. The flag of the university was hoisted and planted a sapling by Uday Samant at MGM’s Chintangah area. After that, the main ceremony was held in the presence of all at Rukmini Hall. This time, Minister Samant said, “It is a pleasure for me to be present at the anniversary of MGM University. MGM did a quality job even during the epidemic and I am very proud that a university can do such a great job. MGM is to be congratulated for doing this work in just two years. MGM is creating a generation of 40,000 students every year. Financial self-reliance is at the core of the new education policy and that principle is already being adopted in MGM. The work done by MGM to date should be shown to all the districts in the state. For this, I will personally take a workshop of all the organizations after Corona and show them the work of MGM, he added. Navjeevan is a Marathi school in Delhi and the Maharashtra government is planning to start a hostel for the children of farmers preparing for UPSC. Samant also expressed optimism that MGM would be more valuable if it participated in the scheme on a PPP basis. So, instead of setting up new institutes, we have a tendency to strengthen the existing quality institutes and produce better students out of them, he said, adding that he intends to launch a policy to start medical colleges under private universities in the near future. MGM Chairman Kamalkishor Kadam said, “Gandhiji had said at the time of independence that it was my job to wipe away the tears in the eyes of every sad person.” The basic concepts of life of that generation were clear and that is our inspiration. We are striving to give students the value of intellectual and financial self-reliance as stated by Vinoba Bhave. He also said that he is confident that knowledge and good manpower will continue to be generated from here on the strength of quality, quality, and creativity. Meanwhile, Vice-Chancellor Dr. Vilas Sapkal outlined MGM University’s plans for the next decade. He said that in the last two years, MGM University has started 281 new courses and about 256 students will do their Ph.D. We are committed to providing interdisciplinary education to students and aim to publish 200 patents, 100 startups, 1000 publications over the next decade. He said that by 2030, besides post-doctoral studies, new courses in pharmacy, law, agriculture, marine engineering, vaccinology, chemical engineering will also be introduced here. Meanwhile, MGM’s home magazine Gawaksh was released by the audience. Registrar Dr . Ashish Gadekar gave an introductory speech. MGM Radio’s Station head Devashish Shedge anchored the program while Prof. Asha Deshpande expressed a vote of thanks.
The vice-chancellor should give me a ‘MGM’s Misal’
MGM’s chairman Kamalkishor Kadam in his speech requested Minister Uday Samant to give one day for MGM premises. During his speech, Samant said, “After about 15 years, I got the opportunity to sit next to former Education Minister Kamal Kishor Kadam. Although this is my first visit to MGM as the Minister of Higher and Education, I used to come here a lot to eat MGM misal with my friend Nilesh Raut. I agree with Kamalbabu’s request to come for the day. But the vice-chancellor should start the day by giving me ‘MGM’s Misal’. ‘ His eloquent speech caused a great deal of laughter in the hall.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यात एमजीएमचे योगदान मोठे*
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे एमजीएम विद्यापीठ वर्धापनदिनी गौरवोद्गार
एमजीएमचा संपूर्ण परिसर तर उत्तम आहेच पण येथून शिकून गेलेले विद्यार्थी त्याहूनही दर्जेदार आहेत. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून एमजीएम गुणवत्तापूर्ण आणि अभिनव शिक्षण देत आहे. त्यामुळे एनईपी राबवण्यात एमजीएमची भूमिका मोलाची असून या विद्यापीठाचे काम इतरांसाठी आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काढले. एमजीएम विद्यापीठाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
या वेळी एमजीएम संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष डॉ. पी.एम.जाधव, कुलपती अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर व्यासपीठावर उपस्थित होते. तर, आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, अतुल सावे आदी नेत्यांसह संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, प्राध्यापक आदीही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
एमजीएमच्या चिंतनगाह परिसरात उदय सामंत यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण आणि वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर रुख्मिणी सभागृहात सर्वांच्या उपस्थितीत मुख्य समारोह पार पडला. या वेळी मंत्री सामंत म्हणाले, एमजीएम विद्यापीठाच्या वर्धापन दिनाला उपस्थित राहणे माझ्यासाठी आनंददायी बाब आहे. महामारी काळातही एमजीएमने दर्जेदार काम केले आणि एक विद्यापीठ इतकी भरीव कामगिरी करू शकते, याचा सार्थ अभिमान वाटतो. अवघ्या दोन वर्षात हे काम आपण केले यासाठी एमजीएम अभिनंदनास पात्र आहे. 40 हजार विद्यार्थ्यांची पिढी एमजीएम दरवर्षी घडवत आहात. आर्थिक स्वावलंबन हा नव्या शैक्षणिक धोरणाचा गाभा आहे आणि ते तत्व एमजीएममध्ये आधीपासूनच अवलंबले जात आहे. आजवर एमजीएमने केलेले काम राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना दाखवले पाहिजे. यासाठी मी स्वत: कोरोना नंतर सर्व संस्थांची कार्यशाळा घेऊन त्यांना एमजीएमचे काम दाखवणार आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. दिल्लीत नवजीवन ही मराठी शाळा असून त्या शाळेलगत यूपीएससी तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतीगृह सुरू करण्याची महाराष्ट्र सरकारची योजना आहे. या योजनेत एमजीएम पीपीपी तत्वावर सहभागी झाल्यास अधिक मोलाचे ठरेल, असा आशावादही सामंत यांनी या वेळी बोलून दाखवला. तर, नव्या संस्था उभे करण्यापेक्षा अस्तित्वात असलेल्या दर्जेदार संस्थांना बळ देऊन त्यातून उत्तम विद्यार्थी घडवण्याकडे आपला कल असून आगामी काळात खाजगी विद्यापीठातंर्गत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे धोरण आणण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले. एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम म्हणाले, प्रत्येक दुःखी माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हे माझे काम असल्याचे गांधीजी स्वातंत्र्यावेळी म्हणाले होते. त्या पिढीच्या आयुष्यबद्दलच्या मूलभूत संकल्पना सुस्पष्ट होत्या आणि त्याच आमच्या प्रेरणा आहेत. विनोबा भावे यांनी सांगितलेले बौद्धिक आणि आर्थिक स्वावलंबनाचे मूल्य आम्ही विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्नरत आहोत. गुणवत्ता, दर्जा आणि कल्पकतेच्या बळावर येथून ज्ञानाची आणि उत्तम मनुष्यबळाची निर्मिती होत राहील, अशी आपल्याला खात्री असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी या वेळी एमजीएम विद्यापीठाची पुढील दशकभराची योजना मांडली. ते म्हणाले, मागील दोन वर्षांत एमजीएम विद्यापीठाने 281 नवे अभ्यासक्रम सुरू केले असून सुमारे 256 विद्यार्थी येथून पीएच.डी करतील. विद्यार्थ्यांना आंतरशाखीय शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून पुढील दशकभरात 200 पेटंट, 100 स्टार्टअप, 1000 प्रकाशनाचे उद्दिष्ट आहे. 2030 पर्यंत येथे पोस्ट डॉक्टरेलसोबतच फार्मसी, विधी, कृषी, मरीन इंजिअरिंग, वेक्सिकोलॉजी, केमिकल इंजिअरिंग हे नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गवाक्ष या एमजीएमच्या गृहपत्रिकेचे उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. एमजीएम रेडिओचे प्रमुख देवाशिष शेडगे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. आशा देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
कुलगुरुंनी मला एमजीएमची मिसळ खाऊ घालावी
एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी मंत्री उदय सामंत यांना एक दिवसभर एमजीएम परिसरासाठी देण्याची विनंती भाषणात केली. त्यावर आपल्या भाषणादरम्यान सामंत म्हणाले, ‘सुमारे 15 वर्षांनंतर मला माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांच्या बाजूला या कार्यक्रमामुळे बसण्याची संधी मिळाली. मी उच्च व शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून एमजीएममध्ये पहिल्यांदाच आलो असलो तरी पूर्वी येथे मित्र निलेश राऊतसोबत एमजीएम मिसळ खाण्यासाठी खूपदा यायचो. कमलबाबूंनी दिवसभरासाठी येण्याचा केलेला आग्रह मी मान्य करतो. पण त्या दिवसाची सुरूवात कुलगुरुंनी मला मिसळ खाऊ घालून करावी.’ त्यांच्या या खुमासदार वाक्याने सभागृहात जोरदार हशा पिकला.
The person who faces challenges while reporting is a true journalist.- Sarita Kaushik
It is important to know the value of a news story and to convey that news to society as well as to face the challenges of recognizing the qualities of a journalist while reporting, said senior journalist Sarita Kaushik.
MGM University’s College of Mass Communication and Journalism has organized a special series of lectures for women journalists who have reached the pinnacle in the field of media. In the fifth session of this lecture series, Sarita Kaushik was talking about ‘Challenges behind the scenes in newscasting’. At this time, the dean of the social sciences faculty of MGM University, Dr. Rekha Shelke, Senior Editor Praveen Bardapurkar, Shubhada Dharurkar, Dr. Asha Deshpande, and others were present.
While guiding on behind-the-scenes challenges in news coverage, Sarita Kaushik gave a number of testimonials on how to face challenges as a journalist. Talking about the challenges, she said that the biggest challenge in news coverage is to face the consequences of reporting something. After that, social media is a big challenge for the current journalists, she said. Many times a journalist needs to be sensitive when reporting on death or an accident, basically, the biggest challenge is to be sensitive. At this time, Kaushik narrated his experience of Naxal attacks and the challenges he faced while covering the Gujarat riots. Asha Deshpande gave an introductory speech, Praveen Bardapurkar introduced the speakers while Prof. Divya Kamble anchored the program.
Lecture by Nivedita Khandekar on September 11
In this lecture series, senior journalist Nivedita Khandekar will give a lecture on September 11 (Saturday) at 11 am. She will interact through the zoom on the topic of ‘Journalism opportunities on environmental and developmental issues’. To participate in this lecture, contact Divya Kamble (9307379131).
आव्हानांना सामोरे जात वार्तांकन करतो तोच सच्चा पत्रकार
ज्येष्ठ पत्रकार सरिता कौशिक यांचे मत
एखाद्या बातमीचे मूल्य जाणून घेऊन ती बातमी समाजापर्यंत पोहोचवणे तसेच वार्तांकन करत असताना आपल्यातील पत्रकाराचे गुण ओळखून आलेल्या आव्हानांना तोंड देऊन पत्रकारिता करणे अवश्यक आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सरिता कौशिक यांनी केले.
एमजीएम विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या वतीने माध्यम क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठलेल्या महिला पत्रकारांच्या विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या पाचव्या सत्रात सरिता कौशिक ‘वार्तांकनातील पडद्यामागची आव्हाने’ या विषयावर बोलत होत्या. या वेळी एमजीएम विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर, शुभदा धारुरकर, डॉ. आशा देशपांडे आदींची उपस्थिती होती.
वार्तांकनातील पडद्यामागची आव्हाने याविषयी मार्गदर्शन करत असताना सरिता कौशिक यांनी अनेक दाखले देत एक पत्रकार म्हणून कशाप्रकारे आव्हानांना सामोरे जावे लागते हे मांडले. आव्हानांबद्दल बोलत असतांना त्या म्हणाल्या की, एखाद्या गोष्टीचे वार्तांकन केल्यानंतर त्याबद्दल होणाऱ्या परिणामांना सामोरे जाणे हे वार्तांकनातील सर्वात मोठे आव्हान असते. त्यानंतर समाजमाध्यम हे एक मोठे आव्हान सध्याच्या पत्रकारांसाठी आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणी ना कुणी नेहमी पत्रकाराच्या वार्तांकनावरती नाराज असते असेही यावेळी त्या म्हणाल्या, अनेक वेळा मृत्यू किंवा अपघाताच्या वार्तांकनावेळी पत्रकाराने संवेदाशिलता बाळगणे अवश्यक असते, मुळात संवेदनशीलता ठेवणे हेच मोठे आव्हान असते. यावेळी कौशिक यांनी नक्षली हल्ल्यांचे तसेच गुजरात दंगलीचे वार्तांकन करत असताना आलेल्या आव्हानाचे अनुभव कथन केले.यावेळी डॉ. आशा देशपांडे यांनी प्रास्ताविक केले, प्रवीण बर्दापूरकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला तर प्रा. दिव्या कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
११ सप्टेंबर रोजी निवेदिता खांडेकर यांचे व्याख्यान
या व्याख्यानमालेत ११ सप्टेंबर (शनिवार) रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ पत्रकार निवेदिता खांडेकर यांचे व्याख्यान होईल. ‘पर्यावरण आणि विकासात्मक विषयांवर पत्रकारितेच्या संधी’ या विषयावर त्या झूमच्या माध्यमातून संवाद साधतील. या व्याख्यानात सहभागी होण्यासाठी प्रा. दिव्या कांबळे (९३०७३७९१३१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एमजीएमच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्वाना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळणे ही आजच्या काळाची गरज – प्रा.एच.एम.देसरडा
२१ व्या शतकात शिक्षणाचे प्रयोजन साधन साक्षरतेकडे नेणारे असावे. त्यासाठी शिक्षणाची व्याख्या बदलावी लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी व्यक्त केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून एमजीएम लोकसंवाद विचारमंचाच्या वतीने ‘शिक्षण क्षेत्रातील आव्हाने’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, सामाजिकशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ.रेखा शेळके, विविध विभाग प्रमुख तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
प्रा. देसरडा पुढे म्हणाले, कोरोनानंतरच्या काळात जी शैक्षणिक आव्हाने समोर आली आहेत त्यात सर्वसामान्यांच्या शिक्षणाची आधीच असलेली दुरावस्था अधिकच चिंताजनक बनली आहे. एकीकडे मुठभर लोकांसाठी सर्व सुविधांयुक्त शिक्षणाची व्यवस्था आहे तर दुसरीकडे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे शिक्षण नाकारले जात आहे. खरेतर आपल्या देशात संसाधनांची कमतरता नाही. मात्र जाणीवपूर्वक त्याचा वापर शैक्षणिक सुविधा आणि गुणवत्ता वाढीसाठी होत नाही. महाराष्ट्रात दरवर्षी सरकारी तिजोरीतून शिक्षणासाठी सत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाते तरी शिक्षणाची अवस्था अत्यंत चिंतनीय आहे. २१ व्या शतकात विकास आणि शिक्षणाच्या संकल्पनेत आमूलाग्र बदल होणे आवश्यक आहे. केवळ लिहीता वाचता येणे व हिशोब करता येणे म्हणजे शिक्षण नाही. तर नैसर्गिक संसाधनांच्या मर्यादित वापराचे कौशल्य वृद्धिंगत करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. जगासमोर आर्थिक विषमता, सामाजिक विसंवाद आणि पर्यावरणीय विद्धवंस या महत्वाच्या समस्या आहेत. त्यांच्या निराकरणासाठी समतामूलक शाश्वत विकासाची दिशा देणारे शिक्षण ही आजच्या काळाची मुख्य गरज गरज असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेखा शेळके यांनी केले. डॉ. विशाखा गारखेडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. .
वृत्तपत्रीय पुरवणी वाचकांच्या मनावर ठसा उमटवण्याचे प्रभावी साधन
एमजीएमच्या व्याख्यानमालेत पत्रकार शुभदा चौकर यांचे मत
वृत्तपत्रांमध्ये बातमीप्रमाणे लेखांनाही महत्व असते. वाचकांना एखाद्या गोष्टीसंदर्भात वेगळे विचार करण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवरील लेख प्रकाशित करण्यात येतात. वृत्तपत्रीय पुरवणी वाचकांच्या मनावर ठसा उमटवण्याचे प्रभावी साधन असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार शुभदा चौकर यांनी केले. एमजीएम विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या वतीने महिला पत्रकारांच्या विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार शुभदा चौकर यांचे ‘पुरवण्यांचे संपादन’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी एमजीएम विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर, शुभदा धारुरकर, डॉ. आशा देशपांडे आदींची उपस्थिती होती.
पुरवण्यांचे संपादन कसे करावे या विषयावर मार्गदर्शन करतांना शुभदा चौकर यांनी सांगितले की, पुरवण्यांचे संपादन करताना विशेष काळजी घेतली जाते. वाचकांच्या मनामध्ये एखाद्या विषयाकडे बघण्यासाठी वाचकांचा दृष्टीकोन तयार करणे गरजेचे असते. वाचकांचे समाजप्रबोधन, मनोरंजन करताना वाचकांच्या भावनांना हात घालून त्यांच्यातील संवेदनशीलता जागृत करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन पुरवण्यांचे संपादन केले जाते. पुरवण्याचे संपादन करताना समतोल साधला जाणे गरजेचे असते. पुरवणी विषयाला धरून असली तरी ती एकांगी स्वरूपाची होणार नाही, याची विशेष काळजी घेऊन संपादन केले जाते. एकाच पुरवणीतून सगळ्या वाचकांच्या आवडीनिवडीचे आणि अभिरुची पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेखा शेळके यांनी केले, प्रवीण बर्दापूरकर यांनी परिचय करून दिला, प्रा. दिव्या कांबळे यांनी सूत्रसंचलन केले, तर आभार डॉ. आशा देशपांडे यांनी मानले.
६ सप्टेंबर रोजी प्रतिमा जोशी यांचे व्याख्यान
या व्याख्यानमालेत ६ सप्टेंबर (सोमवार) रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांचे व्याख्यान होईल. ‘नागरी प्रश्न, प्रशासन व पत्रकारिता’ या विषयावर त्या झूमच्या माध्यमातून संवाद साधतील. या व्याख्यानात सहभागी होण्यासाठी प्रा. दिव्या कांबळे (९३०७३७९१३१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एमजीएमच्या वतीने करण्यात आले आहे.
एमजीएम विद्यापीठात शिक्षक दिनानिमित्त ‘शिक्षण क्षेत्रातील आव्हाने’ विषयावर व्याख्यान
कोरोनानंतर शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या आमूलाग्र बदलांवर एमजीएम लोकसंवाद विचार मंचातर्फे प्रा. एच.एम. देसरडा यांचे ४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिक्षण क्षेत्रातील आव्हाने’ या विषयावर ते आपले विचार मांडतील. आजच्या घडीला शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडून आल्याचे आपण बघतो. त्या अनुषंगाने ते मार्गदर्शन करतील. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विकास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशीष गाडेकर, प्राचार्य डॉ. रेखा शेळके आदी उपस्थित राहतील. तरी या ऑनलाईन व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान एमजीएम विद्यापीठाच्या वतीने करण्यात येत आहे. हे व्याख्यान झूमच्या माध्यमातुन होणार असून सहभागी होण्यासाठी प्रा. विशाखा गारखेडकर (९४२१६६५६५८) यांच्याशी संपर्क साधावा.
The media needs to follow up on social issues
– Sr. Journalist and Social Activist Mangal Khinvasara
We have to give something to society so doing social work is our ultimate duty. In particular, the media should cover all kinds of social issues and also follow up on those issues, said senior journalist and social activist Mangal Khinvasara.
MGM University’s College of Mass Communication and Journalism has organized a special series of lectures of women journalists who have reached the highest peak in the field of media. In the second session of the lecture series, Mangal Khinvasara was speaking on ‘Social Issues and Journalism’. At this time, the dean of the social sciences faculty of MGM University, Dr. Rekha Shelke, Senior Editor Praveen Bardapurkar, Nishikant Bhalerao, Shubhada Dharurkar, Dr. Asha Deshpande, and others were present.
While guiding on social issues and journalism, Mangal Khinvasara highlighted a number of social issues, including the injustice done to women by the media in their workplace or elsewhere, as well as the abuse of senior citizens and cybercrime, the media should raise their voice. Speaking on current journalism, Khinwasara said that capitalism and an open economy are the barriers to journalism. “Social issues need to be taken to the government court through editorials, and it is also important to address those issues. Journalists need to know that there is a social commitment ahead of money,” she said. He also conveyed the message to the youth to fight for social issues till the end. Dr. Rekha Shelke gave an introductory speech, Praveen Bardapurkar gave an introduction to guest, Divya Kamble hosted the program and Dr. Asha Deshpande gave the vote of thanks.
Lecture by Shubhada Chaukar on 3rd September
Senior journalist Shubhada Chowkar will give a lecture on 3rd July (Friday) at 11 am. She will guide through Zoom on the topic of ‘Editing Supplements. To participate in this lecture, contact Divya Kamble (9307379131).
माध्यमांनी सामाजिक विषयांचा पाठपुरावा घेणे गरजेचे
ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांचे मत
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो त्यामुळे सामाजिक कार्य करणे आपले परम कर्तव्य आहे. विशेषतः माध्यमांनी सर्व प्रकारच्या सामाजिक विषयांवर प्रकाशझोत टाकला पाहिजे त्याचबरोबर त्या विषयांचा पाठपुरावा देखील माध्यमांनी घेणे अवश्यक आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी केले.
एमजीएम विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या वतीने माध्यम क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठलेल्या महिला पत्रकारांच्या विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात मंगल खिंवसरा ‘सामाजिक विषय आणि पत्रकारिता’ या विषयावर बोलत होत्या. यावेळी एमजीएम विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर, निशिकांत भालेराव, शुभदा धारुरकर, डॉ. आशा देशपांडे आदींची उपस्थिती होती.
सामाजिक विषय आणि पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन करत असताना मंगल खिंवसरा यांनी अनेक सामाजिक विषयांवर प्रकाशझोत टाकला, त्यामध्ये त्यांनी महिलांवर होणारा अन्याय त्यातही काम करणाऱ्या महिलांवर त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा अन्यत्र होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध माध्यमांनी वाचा फोडली पाहिजे त्याचप्रमाणे ज्येष्ठ व्यक्तींवरती होणारे अत्याचार व सायबर क्राईम द्वारे अत्याचार याविरोधी देखील माध्यमांनी आवाज उठवला पाहिजे असे मत मांडले. सध्याच्या पत्रकारितेविषयी बोलताना खिंवसरा म्हणाल्या की, भांडवलशाही आणि खुली अर्थव्यवस्था हे पत्रकारितेतील अडथळे आहेत. अग्रलेखाच्या माध्यमातून सामाजिक विषय सरकार दरबारी जाणे जरुरीचे आहे तसेच ते विषय सोडवणे देखील अवश्यक आहे, पैशांच्या पुढे सामाजिक बांधिलकी आहे हे पत्रकारांनी जाणून घावे असेही यावेळी त्या म्हणाल्या. सामाजिक प्रश्नांसाठी शेवटपर्यंत अविरत संघर्ष करा असा संदेशही तरुणांना यावेळी त्यांनी दिला. डॉ. रेखा शेळके यांनी प्रास्ताविक, प्रवीण बर्दापूरकर यांनी परिचय करून दिला, प्रा. दिव्या कांबळे यांनी सूत्रसंचलन केले, तर आभार डॉ. आशा देशपांडे यांनी मानले.
३ सप्टेंबर रोजी शुभदा चौकर यांचे व्याख्यान
या व्याख्यानमालेत ३ जुलै (शुक्रवार) रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ पत्रकार शुभदा चौकर यांचे व्याख्यान होईल. ‘पुरवण्यांचे संपादन’ या विषयावर त्या झूमच्या माध्यमातून संवाद साधतील. या व्याख्यानात सहभागी होण्यासाठी प्रा. दिव्या कांबळे (९३०७३७९१३१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एमजीएमच्या वतीने करण्यात आले आहे.
The media needs to have a positive attitude towards women Political Representatives
-Sr. Journalist Pragati Bankhele
The media should cover the work of women, political representatives, without covering their attire, their past, or other things while covering them, and while writing about her, one should be careful not to tarnish her character through their writing said senior journalist Pragati Bankhele.
MGM University’s College of Mass Communication and Journalism has organized a special series of lectures of women journalists who have reached the highest peak in the field of media. In the first session of the lecture series, Pragati Bankhele spoke on ‘Women’s Political Representation and Media’. At this time, the dean of the social sciences faculty of MGM University, Dr. Rekha Shelke, Senior Editor Praveen Bardapurkar, Santosh Andhale, Dr. Asha Deshpande, and others was present.
While guiding on women’s political representation and media, Bankhele said that women’s political rights should be looked at before political representation, women have the right to 100% representation but we need to consider whether it is seen in the political arena. At present, there are 78 women representatives in the Lok Sabha and 27 in the Rajya Sabha. Not even 50% participation of women is seen in politics from Gram Panchayat to the national level. “Even if women are elected as MPs, they have to fight differently as women MPs,” she said. Talking about women MPs and the media, Bankhele said that the media helps in projecting a positive image of women MPs in the country. It also helps to have positivity in other women. To make policies regarding women, it is necessary to have women’s representation to raise women’s issues and problems. For this, the media should write with a positive attitude towards women MPs so that the participation of women in the political arena will increase, she said. Dr. Rekha Shelke gave an introductory speech, Praveen Bardapurkar gave an introduction of guest, Divya Kamble hosted the program and Dr. Asha Deshpande gave the vote of thanks.
Lecture by Mangal Khinvasara on 1st September
Senior journalist and social activist Mangal Khinvasara will give a lecture in this lecture series on July 1 (Wednesday) at 11 am. She will interact on ‘Social Issues and Journalism’ through Zoom. To participate in this lecture, contact Prof. Divya Kamble (9307379131).
माध्यमांनी महिला लोकप्रतीनिधींविषयी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक
ज्येष्ठ पत्रकार प्रगती बाणखेले यांचे मत
माध्यमांनी महिला राजकीय प्रतीनिधींविषयी वार्तांकन करत असताना त्यांचा पेहराव, त्यांचा भूतकाळ किंवा इतर गोष्टींविषयी वार्तांकन न करता त्यांनी केलेल्या कामांचे वार्तांकन करावे, तसेच त्यांच्याविषयी वार्तांकन करत असताना आपल्या लेखणीद्वारे त्यांचे चारित्र्यहनन होणार नाही याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रगती बाणखेले यांनी केले.
एमजीएम विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या वतीने माध्यम क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठलेल्या महिला पत्रकारांच्या विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात प्रगती बाणखेले ‘महिलांचे राजकीय प्रतिनिधीत्व आणि माध्यमे ’ या विषयावर बोलत होत्या. या वेळी एमजीएम विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर, संतोष आंधळे, डॉ. आशा देशपांडे आदींची उपस्थिती होती.
महिलांचे राजकीय प्रतिनिधीत्व आणि माध्यमे याविषयी मार्गदर्शन करत असताना बाणखेले म्हणाल्या की, राजकीय प्रतीनिधीत्वापूर्वी महिलांचे राजकीय हक्क पाहायला हवेत, महिलांना १००% प्रतिनिधित्वाचा हक्क आहे परंतु राजकीय क्षेत्रात ते दिसते का याचा आपण विचार करणे गरजेचे आहे. सध्याच्या घडीला लोकसभेमध्ये ७८ महिला प्रतिनिधी आहेत तर राज्यसभेत त्यांची संख्या २७ इतकी आहे. ग्रामपंचायतीपासून ते अगदी देशपातळीवरील राजकारणामध्ये महिलांचा ५०% देखील सहभाग दिसून येत नाही. जरी महिला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्या तरीही महिला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना वेगळा संघर्ष करावा लागतो असेही यावेळी त्या म्हणाल्या. लोकप्रतिनिधी महिला आणि माध्यमे याविषयी बोलताना बाणखेले म्हणाल्या की, माध्यमांमुळे महिला लोकप्रतिनिधीची सकारात्मक प्रतिमा देशाच्या समोर यायला मदत होते. तसेच इतर महिलांमध्येही त्या महिलेला बघून सकारात्मकता यायला मदत होते. महिलांच्या संदर्भात धोरणे करण्यासाठी, महिलांचे प्रश्न, समस्या मांडण्यासाठी महिलांचे प्रतिनिधीत्व असणे गरजेचे असते. त्यासाठी माध्यमांनी महिला लोकप्रतीनिधीबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन लिहिणे आवश्यक आहे जेणेकरून राजकीय क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढेल असेही यावेळी त्या म्हणाल्या. डॉ. रेखा शेळके यांनी प्रास्ताविक, प्रवीण बर्दापूरकर यांनी परिचय करून दिला, प्रा. दिव्या कांबळे यांनी सूत्रसंचलन केले, तर आभार डॉ. आशा देशपांडे यांनी मानले.
१ सप्टेंबर रोजी मंगल खिंवसरा यांचे व्याख्यान
या व्याख्यानमालेत १ जुलै (बुधवार) रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांचे व्याख्यान होईल. ‘सामाजिक विषय आणि पत्रकारिता’ ,या विषयावर त्या झूमच्या माध्यमातून संवाद साधतील. या व्याख्यानात सहभागी होण्यासाठी प्रा. दिव्या कांबळे (९३०७३७९१३१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एमजीएमच्या वतीने करण्यात आले आहे.
एमजीएममध्ये महिला पत्रकारांची विविध विषयांवर व्याख्यानमाला*
*30 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान ऑनलाईन आयोजन*
एमजीएम विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या वतीने पत्रकारितेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या सहा ज्येष्ठ महिला पत्रकारांची सहा वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. 30 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2021 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत ऑनलाईन पद्धतीने हे व्याख्यान होतील.
30 ऑगस्ट रोजी या व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल आणि ज्येष्ठ पत्रकार प्रगती बाणखेले ‘महिलांचे राजकीय प्रतिनिधित्व आणि माध्यमे’ या विषयावर मत व्यक्त करतील. 1 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार मंगल खिवंसरा ‘सामाजिक विषय आणि पत्रकारिता’, 3 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार शुभदा चौकर ‘पुरवण्यांचे संपादन’, 6 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी ‘नागरी प्रश्न-प्रशासन व पत्रकारिता’, 8 सप्टेंबर रोजी सरिता कौशिक ‘वार्तांकनातील पडद्याआडची आव्हाने’, 11 सप्टेंबर रोजी निवेदीता खांडेकर ‘पर्यावरण आणि विकासात्मक विषयांवर पत्रकारितेच्या संधी’ या विषय विचार मांडतील. या व्याख्यानमालेत सर्वांनी ऑनलाईन पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रेखा शेळके आणि ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी केले आहे. व्याख्यानात सहभागी होण्यासाठी प्रा. दिव्या कांबळे यांच्याशी 9307379131 या क्रमांकावर संपर्क साधावा.
जेएनईसीच्या माजी विद्यार्थी संघटनेची कार्यकारणी जाहीर
एंड्रेस अँड हाऊझरचे कार्यकारी संचालक कैलास देसाई अध्यक्षपदी
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या (जेएनईसी) “अनुबंध” या माजी विद्यार्थी संघटनेची नवी कार्यकारणी जाहिर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी एंड्रेस अँड हाऊझरचे कार्यकारी संचालक व जेएनईसीचे माजी विद्यार्थी कैलास देसाई, उपाध्यक्षपदी देवेन सुपर क्रिटिकल्स प्रा. ली. चे संचालक स्वप्नेषू बसेर, सचिवपदी जेएनईसीचे प्राचार्य हरिरंग शिंदे, सहसचिव ब्रोच टेक्नॉलॉजीचे नीरज खेमका आणि कोषाध्यक्षपदी प्रा. एम. यु. पोपळे यांची निवड करण्यात आली आहे.
‘अनुबंध’ ही सुमारे २५ वर्ष जुनी माजी विद्यार्थी संघटना असून आजवर त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबववत जेएनईसीला बहुमूल्य योगदान दिलेले आहे. कार्यकारिणी निवडीसाठी आयोजित सभेत एमजीएमचे विश्वस्त प्रतापराव बोराडे, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, बजाज समूहाचे डॉ. चंद्रप्रकाश त्रिपाठी, जेएनईसीचे प्राचार्य डॉ. हरिरंग शिंदे, उपप्राचार्य डॉ. विजया मुसांडे, अनुबंधच्या समन्वयक डॉ. परमिंदर कौर यांची उपस्थिती होती. यांच्या उपस्थितीत एकमताने नवीन कार्यकारणी सभासदांची निवड करण्यात आली. जेएनईसीचे १६००० हुन अधिक माजी विद्यार्थी असून त्यांच्यावतीने ही कार्यकारणी संघटना शिक्षण, संशोधन, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सहाय्य यासाठी कार्यरत असणार आहे. सभेत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, ही संघटना गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घेईल. भारतात तसेच विविध देशात ही “अनुबंध” चे स्थानिक अध्यासन निर्माण करून तेथील माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करून विविध उपक्रम राबवेल.
सभेला एमजीएम पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. बी. एम. पाटील, प्रा. गिरीश बसोले, उद्योजक संजय जैस्वाल, विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सभा यशस्वी करण्यासाठी जेएनईसी अनुबंधच्या समन्वयिका डॉ. परमिंदर कौर, शाखा विभागीय समन्वयक प्रा. अजय खके आणि प्रा. आरती साळुंके यांनी पुढाकार घेतला.
छायाचित्रण आंतरिक शक्ती जागृत करणारे माध्यम : कुलगुरू डॉ. विलास सपकाळ
एमजीएम फोटोग्राफी विभागाच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिन साजरा
निसर्गाने आपल्याला अत्यंत प्रभावी दृष्टी दिलेली आहे. त्याच्या माध्यमातून आपण हजारो किलोमीटरवरील तारा आणि अगदी जवळची वस्तूही बघू शकतो. या दृष्टीच्या माध्यमातून अनेक कल्पक गोष्टी साध्य करता येऊ शकतात. मात्र, जगाच्या ज्या भागात आपण सहज पोहोचू शकत नाही तिथे छायाचित्रकार त्यांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून नेऊ शकतात. छायाचित्रण हे आंतरिक शक्ती जागृत करणारे माध्यम असून अत्यंत कमी शब्दांत व्यापक भावना मांडू शकते, अशी भावना एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी व्यक्त केली.
एमजीएम फोटोग्राफी विभागाच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी एमजीएमचे विश्वस्त प्रतापराव बोराडे, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर, उपकुलसचिव प्रेरणा दळवी, फोटोग्राफी विभाग प्रमुख आणि जगप्रसिद्ध छायाचित्रकार बैजू पाटील यांची उपस्थिती होती. या वेळी एमजीएम विद्यापीठाच्या फोटोग्राफी विभागातून उत्तीर्ण झालेल्या पहिल्या तुकडीच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी काढलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. रेखा शेळके प्रास्ताविक करताना म्हणाल्या, एमजीएम फोटोग्राफी विभागामुळे फोटोग्राफीच्या छंदाला अभ्यासक्रमीय स्वरुप मिळून एक निश्चित दिशा मिळाली. आता विद्यार्थी रितसर प्रशिक्षणासोबत पदवीही मिळवू शकतात. बैजू पाटील यांच्यासारख्या अत्यंत अनुभवी आणि जगप्रसिद्ध छायाचित्रकारांच्या सानिध्यात त्यांना शिकता येईल. बैजू पाटील कमी बोलतात मात्र त्यांचे छायाचित्र अनेक अर्थ प्रदर्शित करतात, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. प्रवीण बर्दापूरकर म्हणाले, छायाचित्र हे जीवनाचे आणि निसर्गाचे गाणे आहे. त्यातून वेगळाच आनंद मिळतो. अक्बाच्या 65 रुपयांच्या कॅमेऱ्याने फुलनदेवीच्या शरणागतीवेळचे छायाचित्र घेतल्याची आठवणही त्यांनी सांगितली. प्रा. दिव्या कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
बैजू पाटील यांच्या पुरस्कारप्राप्त छायाचित्रांनी उपस्थित भारावले
या वेळी जगप्रसिद्ध छायाचित्रकार बैजू पाटील यांनी त्यांच्या काही निवडक आंतरराष्ट्रीय छायाचित्रांचे सादरीकरण करत त्या छायाचित्रांमागील संकल्पना, ते काढण्यासाठी घ्यावे लागलेली मेहनत तसेच संपूर्ण परिस्थिती विशद केली. यामध्ये तालछप्पर (राजस्थान) येथे शिकारी घारच्या तोंडून आपले पाडस सोडवणारी हरिण, भरतपूर पक्षी अभयारण्यात हिवाळ्यात संपूर्ण कुटुंबाला उब देणारे माकड, रणथंबोरच्या व्याघ्र प्रकल्पात बछड्यांना घेऊन भटकंती करणारी वाघिण, जिम कॉर्बेट अभयारण्यात उधळलेले हत्तीचे कळप, चंबळघाटीत मासे खातानाचा पानकावळा, लद्दाखच्या पेग्यांग सरोवरात अत्यंत उणे तापमानात टिपलेले चीनी पक्ष्याचे थवे आदींमागील अत्यंत संघर्षमय कहानी बैजू पाटील यांनी विशद केली. ती ऐकून उपस्थित भारावून गेले.